मुंबई : गिरगावातील हिंदू नववर्ष स्वागतयात्रेला यंदा लाखोंची गर्दी जमली होती. जगन्नाथ शंकर शेठ मार्गावर प्रतिमा, देखावे, चित्ररथ, मर्दानी खेळ पाहण्यासाठी कडकडीत उन्हातही गिरगावकरांचा मोठा उत्साह दिसून आला.  (छाया : दीपक साळवी)
मुंबई

Girgaon Shobha Yatra : गिरगावातल्या शोभायात्रेला लाखोंची गर्दी

मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातील संदेशांनी सर्वांचे लक्ष वेधले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित गिरगावातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला यंदा लाखोंची गर्दी जमली होती. वंदे मातरम गीत सादर करत यात्रेला सुरुवात झाली. गिरगावातल्या जगन्नाथ शंकर शेठ मार्गावर प्रतिमा, देखावे, चित्ररथ, मर्दानी खेळ पाहण्यासाठी कडकडीत उन्हातही गिरगावकरांचा मोठा उत्साह दिसून आला. मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातील संदेशांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यावर्षी शोभायात्रेची संकल्पना वंद्य वंदे मातरम गीतावर आधारित होती. हिरवगार कार्पट पांगरलेला आणि त्यावर भारत माता विराजमान असलेला देखावा सर्वांचे लक्ष वेधत होता. जे जे स्कूल ऑफ आर्टमधून पदवी मिळवणाऱ्या मूर्तिकार गितेश पवार आणि गौरव पवार यांनी क्रांतीसुर्य विनायक दामोदर सावरकर यांची 20 फूट उंच प्रतिमा मेहनतीने साकारली होती. प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर प्रथम क्रमांक मिळवणारा महाराष्ट्राचा चित्ररथ शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरला. हा रथ पाहण्यासाठी लोक दुपारी दोन वाजेपर्यंत गिरगावातल्या रस्त्यावरच थांबून राहिली होती.

शिवसेना दक्षिण मुंबई उबाटा गटातर्फे ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांची झाडाखाली बसलेली अतिशय विलोभनीय प्रतिमा साकारली होती. शोभा यात्रेच्या मार्गावर स्वामींचा चित्ररथ येताच श्री स्वामी समर्थांच्या नावाचा जयघोष सुरू झाला होता. शोभायात्रेदरम्यान सावरकर भगतसिंग यासारख्या स्वातंत्र्यवीर आणि पौराणिक कथांवर आधारित सुंदर चित्ररथ देखावे साकारण्यात आले होते.

स्थलांतर झालेली मुळ गिरगावकर मंडळी गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत पारंपरिक वेष परिधान करून नटून-थटून सहभागी झाली होती.

मल्लखांब, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके मुलाना कडेवर घेऊन लोक आवर्जून पाहत होती. शिवसेना, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांतर्फे दूरवरून शोभा यात्रेसाठी आलेल्या नागरिकांकरता लिंबू सरबत, कोकम सरबत, पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आली होती.

SCROLL FOR NEXT