पुढारी ऑनलाईन डेस्क : शिंदे शिवसेनेचे नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर पुत्र अमोल कीर्तिकर यांना लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीवरून आता पक्षातूनच टीकेची झोड उठू लागली आहे. शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी गजान कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
हिंदुत्व, राष्ट्रवाद, आक्रमकता असा आमच्या मनात जो पक्ष आहे, तो भलतीकडेच भरकटत चालला होता. भविष्यामध्ये हा प्रवास धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो. त्या पद्धतीने ते सरकार चालवित आहेत. जनतेशी संवाद साधत आहेत. हे बघता त्याच्या मागे शिवसेनेचे बळ उभे राहिल,अशी परिस्थिती येणाऱ्या काळात बघायला मिळेल. पण याचा अर्थ असा नाही की, त्यांनी पक्षद्रोह केला आहे. पक्षाला बदनाम केलेले आहे.
शिशिर शिंदे हा एक जुना माझा सहकारी आहे. एक ध्येयवादी शिवसैनिक आहे. कोणताही छपा अजेंडा घेऊन तो आलेला नाही. जो विचार करून मी आलेला आहे, तोच विचार तोही घेऊन आला आहे. तो संवेदनशील आहे. छुप्या पद्धतीने कळ लावत्यात त्यापद्धतीने त्यांने काहीही केलेले नाही. तो माझा स्पर्धकही नाही. आम्ही एकमेकांना खूप मानतो. परंतु, त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आलेला आहे.
लोकसभा निवडणुकीत मला मानसिक त्रास झाला आहे. पक्षासाठी आणि पक्षाच्या उमेदवारासाठी जे काही करणे आवश्यक आहे. ते मी केले आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभी केली आहे. त्या शिवसेनेत मी माझ्या मर्जीने एक ठराविक उद्दिष्ट्ये घेऊन मी आलेला आहे. ही शिवसेना संघटनात्मक दृष्ट्या आणखी बळकट कशी होईल, यासाठी माझे उर्वरीत आयुष्य आहे, तोपर्यंत पक्षाला साथ देणार आहे.
शिशिर शिंदे म्हणाले की, एकमेकांना पदावरून खाली खेचण्यासाठी माझ्यात आणि गजानन कीर्तिकर यांच्यामध्ये स्पर्धा नाही. ही स्पर्धा पक्षात चांगले वातावरण राहावे, यासाठी आहे. पक्ष पुढे जावा, आपल्या वक्तव्याने आणि कृतीमुळे पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. याच भावनेने मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मी पत्र लिहिले आहे.
पितापुत्रामध्ये मिठाचा खडा पडावा. घरामध्ये भांडणे व्हावीत, असे कुणीही सुसंस्कृत राजकारणी इच्छा व्यक्त करणार नाही. शेवटी मुलालाही स्वातंत्र्य आहे, तोही वयाने मोठा आहे. वडिलांच्या काही भावना असतात. त्य़ानुसार गजानन कीर्तिकर बोलले असतील. परंतु, हे सर्व पक्षाच्या मुळावर येऊ नये इतकीच माझी भावना आहे.
दरम्यान, कीर्तिकर पितापुत्र एकाच कार्यालयात बसून काम करत होते. त्यामुळे याचा फायदा शिंदे शिवसेनेला न होता, ठाकरे शिवसेनेला झाला. अमोल हे गजानन किर्तीकर यांच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा वापरून आपला राजकीय फायदा करून घेते होते, असा आरोप शिशिर शिंदे यांनी पत्रात केलेला आहे. त्यावरून शिवसेनेत कलगीतुरा रंगू लागला असुन आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा