मुंबई: तुमच्याविरुद्ध मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल झाला आहे, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे, मी मुंबई पोलिसांचा डीसीपी बोलतोय, अशा धमकीच्या किंवा विश्वासार्ह वाटणाऱ्या फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांची लाखो-कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार मुंबईसह राज्यात झपाट्याने वाढत आहेत.
पूर्वी केवायसी अपडेट, बँक खाते किंवा लॉटरीच्या आमिषाने फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार आता थेट पोलीस, सीबीआय, ईडी, आयकर विभाग आणि सायबर सेलच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना मानसिक दबावाखाली आणत असल्याचे तपासातून समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर स्वतःला मुंबई पोलिस दलातील डीसीपी असल्याचे सांगून गुजरातमधील एका व्यावसायिकाची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने डॉ. राज खातिब याला अटक केली. आरोपींनी तुमचे अडकलेले ९८ लाख रुपये परत मिळवून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला आणि पैसे उकळले. हे प्रकरण या नव्या प्रकारच्या फसवणुकीचे ताजे उदाहरण मानले जात आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या टोळ्या आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. व्हिडिओ कॉलदरम्यान पोलीस ठाण्यासारखी पार्श्वभूमी, बनावट ओळखपत्र, अधिकृत लोगो, गणवेश आणि बनावट कागदपत्रे दाखवून पीडित व्यक्तीला "डिजिटल अटक" झाल्याचा आभास निर्माण केला जातो. त्यानंतर तपासासाठी पैसे सुरक्षित खात्यात जमा करा, रक्कम पडताळणीनंतर परत मिळेल, अशा कारणांवरून मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडले जाते.
२०२५ मध्ये केवळ 'डिजिटल अटक' प्रकारातील फसवणुकीत मुंबईकरांनी सुमारे ₹१५५ कोटी गमावल्याची माहिती तपास यंत्रणांनी यापूर्वी दिली आहे. या बहुतांश प्रकरणांत आरोपींनी स्वतःला पोलीस, सीबीआय किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी म्हणून सादर केले होते.
मुंबईत अशा प्रकारची अनेक गाजलेली प्रकरणे समोर आली आहेत. घाटकोपरमधील ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ईडी अधिकारी असल्याचे सांगत व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर सुप्रीम कोर्टाने अटक व मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत, अशी भीती दाखवून ५० लाख रुपये आरटीजीएसद्वारे उकळण्यात आले.
तर दक्षिण मुंबईतील ८६ वर्षीय महिलेची तब्बल २० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात आरोपींनी स्वतःला मुंबई पोलीस, सीबीआय आणि ईडी अधिकारी असल्याचे सांगत अनेक दिवस "डिजिटल अटक" ठेवून पैसे उकळले. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती.
याशिवाय, विलेपार्ले येथे एका तोतया पोलिसाने प्रवाशाला गुटखा खाल्ल्याचा आरोप करत अटक करण्याची धमकी दिली आणि दंडाच्या नावाखाली १३ हजार उकळून पसार झाल्याची घटनाही अलीकडेच उघडकीस आली.
पोलिसांचा सल्ला
पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलवर पैसे मागत नाही. डिजिटल अटक अशी कोणतीही कायदेशीर संकल्पना नाही. अशा प्रकारचा फोन आल्यास त्वरित कॉल बंद करून अधिकृत पोलीस किंवा सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवावी.