नवी मुंबई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला गड (लोणावळा) येथील आगरी-कोळी समाजाची कुलस्वामिनी व कुलदैवत आई श्री एकविरा देवीच्या चैत्री यात्रेनिमित्त पार पडणाऱ्या मानाच्या पालखी सोहळ्याची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा भव्य आणि भक्तिमय पालखी सोहळा बुधवार (दि. 25) मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला आगरी-कोळी समाजासह राज्यभरातून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. या यात्रेत मानाच्या पालखीला विशेष धार्मिक महत्त्व असून दरवर्षी पारंपरिक पद्धतीने एका कोळीवाड्याला पालखी नेण्याचा मान दिला जातो. या परंपरेनुसार पनवेल, पेण आणि ठाणे कोळीवाडे हे पालखीचे मानकरी मानले जातात. यंदा हा मान पनवेल कोळीवाड्याला मिळाल्याने भाविकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल कोळीवाड्यात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून पालखी सोहळ्याच्या तयारीला गेल्या पंधरा दिवसांपासून वेग आला आहे.
यावेळी संपूर्ण परिसरात कागदी पताका, दारोदारी रांगोळ्या, मोत्याच्या माळीची पालखीला आकर्षक सजावट करण्यात येत असून, फुलांनी पारंपरिक सजावटीने पालखी सजविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि गुलालाच्या उधळणीत आई एकविरा देवीच्या जयघोषात ही मानाची पालखी पनवेल कोळीवाड्यातून कार्ला गडाकडे भक्तिभावाने मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने परिसरात उत्सव आणि भक्तीचे वातावरण निर्माण होणार आहे.