Vidhan Sabha Monsoon Session 2026: महाराष्ट्राच्या विधनसभा पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला. विरोधक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने हा सभात्याग केला. त्यांनी विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे आपल्या अख्त्यारीतील खात्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांवर टाकतात असा आरोप केला.
ही प्रथा बरोबर नाही हा विरोधकांचा अपमान आहे असं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जोर का झटका दिलाय अजून झटके देणार असं म्हणत ठाकरे गटाला थेट इशारा दिला.
याबाबत सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे आपल्या अखत्यारीत असलेल्या विभागांसंदर्भातील प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे देतात त्याचप्रमाणे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील आपले विभाग इतर मंत्र्यांना विभागून देत आहेत. याला जयंत पाटील, विजय वडेट्टीवर, नाना पटोले यांनी विरोध केला.
यावर उपमुख्यमंत्र्यांची पाठराखण करण्यासाठी शंभूराज देसाई उठले आणि म्हणाले, २०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनीच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली का... २०१९ ते २२ मध्ये हे चालले आता का चालत नाही. तुमच्या काळात चालत आणि आता चालत नाही.
मात्र या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी एकनाथ शिंदे उत्तर द्यायला घाबरतात ते सभागृहात उत्तर देत नाहीत असं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. बाहेर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर टीका केली.
दरम्यान, या गोंधळानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आले आणि त्यांनी सभागृहाचे कामकाज हे अध्यक्ष तुमच्या अध्यक्षतेखाली चालते असे म्हणत कालच्या सहा खासदारांच्या पक्षप्रवेशाचा संदर्भ देत काल जोर का झटका दिल्यामुळं त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. आणखी झटके देणार आहे असे म्हणत शिंदेनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं.
शिंदे यांनी कोण होतास तू काय झालास तू असे म्हणत ठाकरे गटावर बोचरी टीका केली. त्यांनी विजय वडेट्टीवर आणि जयंत पाटील यांना तुम्ही ज्येष्ठ आहात. या पोरा टोरांचे काय ऐकता असा मिश्कील सल्ला दिला.
दरम्यान, भास्कर जाधव यांनी सभात्याग करून बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलताना सरकारने विरोधी पक्षांना दिलेल्या वागणुकीबद्दल आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी मान सन्मान राखला पाहिजे. पण अध्यक्षांकडून वारंवार त्याचे पालन होत नाही.'
भास्कर जाधव यांनी '२०२२ पासून २०२६ पर्यंत आम्हाला विधिमंडळ कार्यालय मिळालेलं नाही. सरकारला लाजा वाटलं पाहिजे. शेतकरी पक्षाचे त्यांचे कार्यालय आहे. शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य असताना आम्हाला कार्यालय नाही. जन सुराज्य पक्षाचे दोन आमदार त्यांना कार्यालय आणि त्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि अध्यक्ष करतात.' अशी टीका केली.