मुंबई: आमच्या मंत्र्यांना त्यांच्या विभागातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. मंत्रिमंडळात एकमताने घेतलेले निर्णय फिरविले जात आहेत. त्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याचे वृत्त आहे.
यावर तुमच्या मंत्र्यांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात आमदारफुटी प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात आला आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार यांच्यात आधीच अस्वस्थता आहे. त्यात निर्णय फिरवले गेल्याने ते आणखी वाढले.
शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच हा निर्णय एक वर्षासाठी स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत.
एमआयडीसीबाबतही संबंधित मंत्र्यांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रारी केल्या. अमित शहा कौटुंबिक कारणासाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मंत्र्यांच्या तक्रारीबाबत मी लक्ष घालेन, असे त्यांनी शिंदे यांना आश्वस्त केले. नगर विकास, गृहनिर्माण या आपल्याकडील खात्यात कोणते निर्णय घेतले जात आहेत, याबाबत शिंदे यांनी शहा यांना माहिती दिली.
चिंता करू नका : शहा
सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. मंत्री आणि आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर काय, असे आमदारांचे म्हणणे आहे. यावर चिंता करू नका, असे शहा यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितल्याचे कळते.