मुंबई: आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती, वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेव्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. आखाती देशामधून भारतात सुकामेव्याची आवक कमी हाेत असल्याने मुंबईतील बाजारपेठेत प्रतिकिलो दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. चांगल्या दर्जाचा अमेरिकन बदाम ८०० रुपयांवरुन एक हजार रुपये तर इराणचा मामरा बदाम २८०० रुपयावरुन ३२०० रुपये इतका झाला आहे.
सध्या मुंबईतील क्राॅफर्ड मार्केट (महात्मा ज्योतिबा फुले मंडई), दादर,मस्जिद बंदर या सारख्या बाजारपेठेत सुकामेव्याचे प्रतिकिलो दर सरासरी २०० रुपयांपासून ते साडेतीनशे-चारशे रुपयांपर्यत वाढत आहे.
इराण व इराक या आखाती देशात मामरा बदाम, पिस्ता काजू, खारा पिस्ता तर अमेरिका आणि चिलीमधून अक्रोडचे उत्पादन होते. सौदी अरेबियातून सर्वप्रकारचे खजूर, अंजीर व मनुके या ठिकाणी येतात.
प्रतिकिलो खजूर ५०० रुपये किलोपासून ते १७०० रुपयांपर्यंत आणि अंजिर १३०० रुपयांपासून ते ३२०० रुपयांपर्यंत इतका दर पोहोचला आहे. सावंतवाडी काजू हा १ हजार रुपयापर्यंत गेला आहे.त्यात १०० रुपयांची वाढ झाली तर चंदगड भागातील काजूचा दर हा ९६० रुपयांवरुन तो ९८० रुपये इतका झाला असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
सुकामेव्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. आरोग्याला सुकामेवा हितकारक आहे. त्यामुळे ग्राहक कायम आहे. युद्धजन्य स्थिती अशीच राहिली तर पुढील काळात सुकामेव्याचे दर वाढ होण्याची शक्यता आहे.- प्रविण म्हस्के, सुकामेवा विक्रेते, क्राॅफर्ड मार्केट