डोंबिवली : वारंवार सूचना दिल्या आणि कारवाया केल्या, तरीही फेरीवाले डोंबिवलीच्या रेल्वे स्टेशन परिसरातीतून हटण्यास तयार नाहीत. दीडेश मीटरच्या आत फूटपाथसह रस्तेही बळकावून बसलेल्या फेरीवाल्यांवर सोमवारी सकाळी फ प्रभाग क्षेत्रचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख मिलिंद गायकवाड आणि वेदपाल तिसांबर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कारवाईची यथेच्छ झोड घेतली. अचानक कारवाई सुरू होताच फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. फेरीवाल्यांना सामान बचावाची संधी न देता त्यांचे सर्व सामान जप्त करण्यात आले. काही सामानाची मोडतोड करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांपासून फ प्रभाग हद्दीत रेल्वे स्टेशनपासून 250 मीटरच्या आत फेरीवाले वर्दळीच्या पंडित नेहरू रोड, बापूसाहेब फडके रोड, बाजीप्रभू चौक, पाटकर रोड, चिमणी गल्ली परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. सततच्या कारवाईमुळे रस्ते आणि फुटपाथ मोकळे राहत असल्यामुळे डोंबिवलीकर समाधान व्यक्त करत आहेत.
आयुक्त अभिनव गोयल यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वायत्तता दिली आहे. आयुक्तांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी डोंबिवलीच्या फ आणि ग प्रभागात सुरू आहे. फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर, फेरीवाला हटाव पथक प्रमुख मिलिंद गायकवाड आणि वेदपाल तिसांबर यांच्या उपस्थितीत कारवाई सुरू आहे.
फ प्रभागाकडून दररोज ही कारवाई सुरू असल्याने नेहरू रोडवरील पाणी पुरी, भेळपुरी विक्रेते बेपत्ता झाले आहेत. दीडशे मीटरच्या आत शोरमा गर्लला खाद्य पदार्थ विक्री करण्यास केडीएमसी परवानगी देते. राजकीय नेते तिला पाठबळ देतात. मग आमच्यावरच अन्याय का ? असा सवाल उपस्थित करणाऱ्या फेरीवाल्यांच्या ठेले आणि सामानासकट या पथकाने शोरमा गर्लचा स्टॉल उचलून अडगळीत आणून उभा केला. सरसकट कारवाई करताना दीडशे मीटरच्या आतील सर्व फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीवर फेरीवाले ठाम आहेत. मनसे नेत्यांच्या आशीर्वादाने दीडेशे मीटरच्या आत उभ्या राहिलेल्या शोरमाच्या स्टॉलवर कारवाई होत नसल्याने इतर खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केडीएमसीच्या एकतर्फी कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती.