महाविकास आघाडी  
मुंबई

'मविआ'ची रुळावर आलेली गाडी अन् १८ सिग्नल्स!

Maharashtra Assembly Election : विदर्भातील जागा सोडण्यास काँग्रेसचा नकार

पुढारी वृत्तसेवा
नरेश कदम

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या आधी आपले जागावाटप करून महाविकास आघाडी सरस ठरली होती. लवकर जागावाटप जाहीर करण्याचा फायदा आघाडीला निवडणुकीत झाला होता; मात्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात महाविकास आघाडीने खूप गोंधळ घातलेला आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आठ-दहा तास चाललेल्या आघाडीच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठकांमध्ये चर्चेचे गुर्‍हाळ सुरू होते. आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या.

विदर्भ आणि मुंबईतील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू होती. लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसला रामटेक आणि अमरावती या लोकसभेच्या जागा दिल्या. त्यामुळे विदर्भात चार-पाच जागा जास्त द्याव्यात, अशी मागणी ठाकरे गटाची आहे; मात्र यावेळी लोकसभेसारखे नमते घ्यायचे नाही, तर आक्रमक भूमिका घ्यायची, असा पवित्रा काँग्रेस नेत्यांचा आहे. त्यामुळे काँग्रेसने विदर्भातील जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे ठाकरे गटाचे नेते बिथरले. त्यांनी जागावाटपाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. नाना पटोले असतील, तर आम्ही जागावाटपाच्या बैठकीला येणार नाही, असे ठाकरे गटाचे नेते सांगू लागले. ‘मातोश्री’वर नेत्यांची तातडीची बैठक बोलवली. राज्यातील पक्षांना पदाधिकार्‍यांना फोन गेले की स्वबळावर लढण्यास तयार राहा. या केवळ धमक्या असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले. काँग्रेसचे नेतेही दिल्लीत गेले. कोणताही निर्णय घेण्यास काँग्रेस तयार आहे, असे सांगितले गेले. त्यामुळे आघाडी तुटते की काय अशी स्थिती निर्माण केली गेली; पण शेवटी काँग्रेसने पुन्हा ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे गटाच्या प्रमुखांना भेटून चर्चेचे दरवाजे उघडले. लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकलेल्या काँग्रेसला विदर्भात सर्वाधिक जागा हव्या आहेत, तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती येथील जागांसाठी ठाकरे गट अडून बसला आहे. काही जागा देण्याचे काँग्रेसने मान्य केले.

काँग्रेसला रोखण्याची रणनीती

आघाडीतील या संघर्षामध्ये एक गोम आहे. आघाडीत सर्वाधिक जागा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकेल. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा लढविण्यापासून वेसण घालायची. तसेच ज्या विदर्भात काँग्रेस चांगली कामगिरी करेल असे वाटते तेथील जागांची मागणी करायची, अशी ठाकरे गट आणि शरद पवार गटाची रणनीती आहे. काँग्रेसने जास्त जागा लढवून 85-90 जागा जिंकल्या, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून काँग्रेसला आवरण्याचे प्रयत्न या जागावाटपाच्या निमित्ताने झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT