मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थ खाते परत द्यावे, अशी मागणी केली आहे; मात्र या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याचे पालन होईल. तोवर अर्थ खाते माझ्याकडे असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी माध्यमाला मुलाखत देताना सांगितले.
काही खासदार भारतीय जनता पक्षात येण्यास तयार होते मात्र भारतीय जनता पक्षाला या खासदार आमदारांसाठी दरवाजे उघडे करायचे नाहीत. त्यांनी त्यांचे मूळ असलेल्या पक्षात जावे अशी भूमिका आहे. वेगळा प्रसंग आला तरच या भूमिकेत बदल होईल असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात उत्तम संवाद आहे. सर्व निर्णय सहमतीने घेतले जात आहेत मंत्रिमंडळातले निर्णय एकमताने पारित होतात असेही ते म्हणाले.
जेव्हा गरज होती तेव्हा मदतीला आले नाही!
उद्धव ठाकरे यांच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. आमचा प्रेमभंग झालेला आहे दुसरा विवाह होऊन वर्धापन दिन ही साजरे झाले आहेत. 2019 च्या घटनाक्रमाचा थेट उल्लेख न करता ते म्हणाले,' जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या प्रेमाची मला गरज होती तेव्हा त्यांनी ते दिले नाही.आता अंतर पडले आहे. प्रेम संपले. आता एकत्र प्रवासाचे म्हणाल तर विमान कंपनीने ज्या जागा दिल्या त्या जागांवर आम्ही बसलो.प्रचंड मोठे अंतर होते आणि ते अंतर हीच सध्याची वस्तुस्थिती आहे, असेही फडणवीस म्हणाले.
नेतृत्व निराशजनक असले की पक्ष फूटतात. आम्ही १५ वर्षे विरोधात होतो. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता होता. त्यामुळे लढायची जिद्द होती. आता विरोधी नेते तसे नसल्याने पक्ष सोडून नेते बाहेर पडतात, असेही त्यांनी सांगितले.
सत्तेत आल्यानंतरच ज्या काही योजना राबवायच्या असतात त्या राबवू शकतात. सत्तेत गेल्यानंतरच अक्कल वापरता येते असेही त्यांनी हसत हसत नमूद करत शेवटी सत्तेत येणे आवश्यक असल्याचा मुद्दा समोर आणला.महाराष्ट्राची आर्थिक स्थिती हलाखीची नाही.काहीसा ताण निश्चित आहे मात्र महाराष्ट्र अनुत्पादक खर्च कमी करेल.नियंत्रण आणेल. उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करेल . या प्रयत्नात अर्थमंत्री या नात्याने मी यशस्वी होईन असेही त्यांनी नमूद केले.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात कधीही बंद होणार नाही. ते निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही दिलेले वचन आहे २ हजार १०० रुपयांची घोषणा आम्ही केलेली आहे ती पूर्ण केली जाईल असेही त्यांनी सांगितले. आप आणि काँग्रेस अशा पक्षांनी सवलती देण्यात सुरुवात केल्यानंतर निवडणूक राजकारणात भारतीय जनता पक्ष मागे राहू शकला नाही, निवडून येण्यासाठी हे सवलती देणे सुरु झाले. ते करावे लागले, असेही फडणवीस म्हणाले.