मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत वस्तू शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी खरेदी करणे अपेक्षित असताना मुंबई महापालिकेने शाळा सुरू झाल्यानंतर आता दप्तर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दप्तर मिळायला महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका दरवर्षी २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करते. यामध्ये शालेय पुस्तकांसह दप्तर, छत्र्या, शूज, रेनकोट, पाण्याची बाटली, पेन्सिल, वह्या, गणवेश व अन्य साहित्याचा समावेश आहे.
पालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड आणि उर्दू या ८ माध्यमांच्या शाळांमध्ये तीन लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या वस्तूचे वाटप करण्यात येते. परंतु या वस्तू शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी खरेदी करणे अपेक्षित असते.
जानेवारीमध्ये निविदा प्रक्रिया राबवून या वस्तू मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्येक शाळेत दाखल होणे आवश्यक आहे. मात्र महापालिका उशिराने निविदा प्रक्रिया राबवत असल्यामुळे शालेय वस्तू खरेदीला उशीर होत आहे.
महापालिकेने छत्री वह्या, पुस्तके, गणवेश, व अन्य वस्तू खरेदीसाठी कंत्राटदाराची अलीकडेच नियुक्ती केली.
त्यामुळे या वस्तूही अद्यापपर्यंत मिळालेल्या नाही. दप्तर खरेदीची निविदा प्रक्रिया आताच पूर्ण करून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. समितीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर किमान एक ते दीड महिन्यानंतर दप्तरांचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये दप्तर मिळतील असे सांगण्यात येत आहे.
४६ कोटी ४५ लाखाची खरेदी
दप्तर खरेदीसाठी मुंबई महानगरपालिका ४६ कोटी ४५ लाख रुपये खर्च करणार आहे. पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरांचा पुरवठा करण्यात येणार आहे. सरासरी एका दप्तरची किंमत ३६५ ते ५८९ रुपये इतकी आहे. या दप्तरांसोबत पाण्याची बाटली सह जेवणाचा डबा ही दिला जाणार आहे. यासाठी प्रति पाण्याची बाटली व जेवण्याच्या डब्यासाठी १६५ रुपये ते १९३ रुपये मोजण्यात येणार आहेत.