मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि अवैध संपत्ती गोळा केल्याचा गंभीर आरोप करत अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत थेट चौकशीचे खुले आव्हान दिले आहे.
अजय बारस्कर यांनी ईडी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन उपसंचालकांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. मराठा आंदोलनाचा गैरवापर करून वाळू माफियांच्या माध्यमातून कमीत कमी एक हजार कोटी रुपयांचा अफाट भ्रष्टाचार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या काळ्या पैशांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बारस्करांनी केली.
यामध्ये पांडुरंग तारक, किशोर बलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम कुरणकर, संजय कटारे, स्वप्निल तारक, बद्रीनाथ तारक आणि विलास खेडकर यांच्या नावांचा समावेश आहे. आंदोलकांकडे अचानक आलेल्या महागड्या डिफेंडर गाड्या, लीलावती रुग्णालयातील उपचारांवर झालेला प्रचंड खर्च आणि पांडुरंग तारक यांनी खरेदी केलेली ५० एकर व २८ एकर जमीन नेमकी कुठल्या पैशांतून आली, असा थेट सवाल बारस्करांनी उपस्थित केला आहे.
या आरोपांनंतर जरांगे यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत बारस्करांना सडेतोड उत्तर दिले आहे. केवळ मनोज जरांगे यांना आणि या प्रामाणिक आंदोलनाला बदनाम करण्याच्या हेतूनेच हे खोटे आरोप रचले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही आंदोलनात पैसे कमवण्यासाठी आलो नसून, स्वतः आधीपासून सक्षम असल्यामुळे समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने दादांच्या पाठीशी उभे आहोत, असे काळकुटे म्हणाले.
आपली बाजू मांडताना काळकुटे यांनी थेट तपास यंत्रणांनाच आव्हान दिले आहे. महाराष्ट्र, देश किंवा जगातील कोणत्याही सर्वोच्च संस्थेमार्फत आमची खुशाल चौकशी करावी, आम्ही प्रत्येक तपासाला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले.
एवढेच नव्हे तर माझी, माझ्या कुटुंबाची, मित्रांची आणि सर्व नातेवाईकांची घरे झाडून झडती घ्यावी; चौकशीत दोषी आढळल्यास आम्हाला कायद्यानुसार जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी, असे आव्हान त्यांनी दिले. मात्र, विनाकारण बदनामी खपवून घेणार नसून, बारस्करांनी आपल्यावरील आरोपांचे ठोस पुरावे सादर करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करू, असा इशाराही काळकुटे यांनी दिला आहे.