मुंबई : नरेश कदम सहा खासदार फुटल्यामुळे निस्तेज झालेल्या उद्धव ठाकरे गटाला कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून संजीवनी मिळाली आहे. तसेच उग्र आंदोलनात सामील होण्याची संधी मिळाल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. नीटसह सीबीएससी, टीईटी अशा अनेक पेपरफुटींविरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशभरात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. केंद्रातील भाजप सरकारला केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे. तसेच मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांनी शिवाजी पार्क येथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला तरुणाईने प्रचंड प्रतिसाद दिला होता.
तसेच या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी, तिरंगा उंचावूया...या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या तरुणाईला 'आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा शब्द दिला होता.
त्यामुळे पेपरफुटीचे प्रकरण आणि त्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन हे दोन्ही ठाकरे बंधूंच्या पथ्यावर पडले आहे. केंद्रातील आणि पर्यायाने राज्यातील भाजप सरकारविरोधातील तरुणाईचा संताप याचा राजकीय फायदा दोन्ही ठाकरे बंधूंना होऊ शकेल, असे या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.
काँग्रेसपेक्षा ठाकरे बंधूंचा पाठिंबा
मुंबईसह राज्यात कॉक्रोच जनता पार्टीसाठी महत्वाचा आहे. या नव्या पार्टीचे राज्यात संघटन नाही. पण सोशल मीडिया हे या जेन झीचे आंदोलनाचे प्रमुख हत्यार आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलन यशस्वी केले. पेपरफुटीमुळे तरुणाईमध्ये सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल खदखद आहे.
दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन
केंद्रातील भाजप सरकारने दिले होते. पण नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. तसेच उद्योग परराज्यात जात आहेत. त्यामुळे रोजगाराचा मुद्दा लवकरच कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून उचलण्यात येणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे हे आंदोलन असेल पण दोन्ही ठाकरे बंधूंचा सक्रिय सहभाग असेल, असे ठाकरे गटाच्या एका नेत्याने सांगितले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका २०२९ मध्ये होणार आहेत. पण आता तडजोडीचे राजकारण न करता सरकारमधील गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवण्याची रणनीती ठाकरे बंधू आखत आहेत...