मुंबई: डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांना धमकावून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी टोळ्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशव्यापी कारवाई केली.
ऑपरेशन चक्र-६ अंतर्गत तीन डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये सीबीआयने २० राज्यांतील ८९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. बँकिंग कागदपत्रे, खात्यांशी संबंधित नोंदी, डिजिटल उपकरणे आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
सीबीआयने विविध राज्यांमधून डिजिटल अरेस्टशी संबंधित गुन्हे तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणांतील आरोपी पोलिस आणि सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना डिजिटल पद्धतीने नजरकैदेत ठेवत होते. त्यानंतर कायदेशीर कारवाईची भीती दाखवून पीडितांकडून मोठ्या रकमा आपल्या खात्यांमध्ये वळत्या करून घेतल्या जात होत्या.
सीबीआयने केलेल्या कारवाईतील तीन प्रकरणांमध्ये एकूण ४२.३६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. यातील एका प्रकरणाचा संबंध पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स आहे. या प्रकरणात पीडिताला तब्बल तीन महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले.
दुसऱ्या प्रकरणात गुजरातमधील पीडिताला तीन महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून १९.२४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. तर कर्नाटकातील तिसऱ्या प्रकरणात पीडिताला सुमारे महिनाभर डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून १५.४५ कोटी रुपये उकळण्यात आले. या दोन्ही प्रकरणांतही आरोपींनी पोलिस अधिकारी असल्याचे भासवले होते.
पैसे फिरवणाऱ्यांवरही कारवाई
छापेमारीदरम्यान अटक करण्यात आलेल्या तिघांची चौकशी करण्यात आली. फसवणुकीची रक्कम स्वीकारणे, तिचे विविध खात्यांमध्ये वर्गीकरण करणे आणि पुढे अन्य खात्यांत वळवणे, अशी भूमिका या आरोपींची असल्याचे तपासात उघड झाले.
हरियाणातील आकाश याच्या खात्यात फसवणुकीतील १.९५ कोटी रुपये जमा झाले होते. त्याने स्वतः खाते उघडले आणि ही रक्कम त्याच दिवशी अन्य खात्यांमध्ये वळवली. त्यामुळे फसवणुकीच्या पैशांच्या गैरव्यवहारात त्याची थेट भूमिका असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
कोलकात्यातील राजा कर्मकार याच्या फर्मच्या खात्यात १.५ कोटी रुपये जमा झाल्याचे आढळले. तसेच ज्योती राणी हिच्या खात्यात फसवणुकीतील काही रक्कम जमा झाली होती. तिने त्यातील काही रक्कम रोख स्वरूपात काढली, तर उर्वरित रक्कम अन्य खात्यांमध्ये वळवलयाचे सीबीआयच्या अधिकार्यांनी सांगितले.