Extortion Case Pudhari
मुंबई

Borivali Jeweller Extortion Case: बोरिवलीत लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणी; ज्वेलर्सला धमकी देणारे चौघे जेरबंद

30 लाखांची मागणी करून जीव मारण्याची धमकी; बोरिवली पोलिसांची झडप, झारखंडला पळण्याआधीच अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बोरिवलीतील एका ज्वेलर्स व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून खंडणीसाठी धमकी देणाऱ्या चौघांना बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. रियाजउद्दीन मोहम्मद बशीर, मोहम्मद फैय्याज मोहम्मद कय्युम मंसुरी ऊर्फ सद्दाम, मोहम्मद आश्रफुल कादरी मोहम्मद हासिम अन्सारी व मोहम्मद आरबाज अन्सारी मोहम्मद इजहार अन्सारी अशी या चौघांची नावे असून ते झारखंडच्या धनबादचे रहिवासी आहेत. चौघांनाही बुधवारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. झटपट पैशांसाठी त्यांनी ही धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले.

यातील ज्वेलर्स व्यापारी बोरिवली परिसरात राहत असून तिथेच त्यांच्या मालकीचे एक ज्वेलर्स दुकान आहे. त्यांच्याकडे तक्रारदार मॅनेजर म्हणून काम करतात. 19 फेब्रुवारीला त्यांच्या शॉपच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने मेसेज करून त्याने बिष्णोई टोळीचा सदस्य बोलत असल्याचा दावा केला होता. यात त्याने त्यांच्याकडे तीस लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा अज्ञात व्यक्तीने खंडणीसाठी कॉल करुन ही रक्कम दिली नाही तर त्यांचा बाबा सिद्धीकी करू, अशी त्याने धमकी दिली. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 21 फेब्रुवारीला त्याच व्यक्तीने त्यांना खंडणीसाठी धमकी दिली. यावेळी त्यांनी त्याला एक लाख रुपये देतो असे सांगितले असता त्याने त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली. चर्चेअंती त्यांच्यात चार लाखांमध्ये समझोता झाला. यावेळी त्याने त्यांना ही रक्कम एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने कॉल कट केला.

या प्रकारानंतर ज्वेलर्स व्यापारी प्रचंड घाबरला होता. त्याने घडलेला प्रकार बोरिवली पोलिसांना सांगत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. ही शोधमोहीम सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुसुदन नाईक, पोलीस निरीक्षक मिलिंद नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील, प्रमोद निंबाळकर, राजेश कदम, पोलीस हवालदार रमेश गायकवाड, पोलीस शिपाई सच्चिदानंद रेवाळे, महेश पाटील, कदम यांनी रियाजुद्दीनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यात सहभाग उघडकीस आला. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी वांद्रे व जोगेश्वरीतून मोहम्मद फैय्याज, मोहम्मद आश्रफुल आणि मोहम्मद आरबाज या तिघांना अटक केली. चौकशीत ते चौघेही झारखंडच्या धनबादचे रहिवासी असून त्यांनी खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली.

झारखंडला पळून जाण्याआधीच पोलिसांची झडप

गेल्याच आठवड्यात ते झारखंड येथून मुंबईत आले होते. खंडणीची मिळेल ती रक्कम घेतल्यानंतर ते चौघेही झारखंडला पळून जाणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही व्यापारी, व्यावसायिकांना धमकी दिली आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT