मुंबई ः बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल होऊन किती दिवस झाले? त्या शाळेच्या ट्रस्टींना अजून बेड्या का ठोकल्या नाहीत? आदी प्रश्नांची सरबत्ती करून मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. आरोपींना जामीन मिळण्याची वाट तुम्ही पाहात आहात काय, असा प्रश्नही न्यायालयाने पोलिसांना विचारला. बदलापूर प्रकरणाची दखल उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत यासंदर्भात याचिका दाखल करून घेतली.