मुंबई : मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या आयुष्यात आई आणि वडील दोघांचीही उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. दोन्ही पालकांचे स्थान तितकेच महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुलाच्या कोठडीच्या प्रकरणात याचिकाकर्त्या महिलेला झटका दिला.
6 वर्षांच्या मुलाच्या ताब्याशी संबंधित याचिकेवर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने आईच्या हट्टी स्वभावावर तीव्र नाराजी व्यक्त करीत स्पष्ट मत मांडले.
मुलाच्या पालकांचे अर्थात या प्रकरणातील पती-पत्नीचे 2016 मध्ये लग्न झाले होते. 2020 मध्ये त्यांना मुलगा झाला. मात्र कौटुंबिक वादानंतर मे 2021 पासून दोघेही वेगळे राहत आहेत. मुलाचा ताबा सध्या आईकडे आहे. वडिलांनी मुलाला भेटण्याचा अधिकार मिळावा यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने वडिलांच्या बाजूने निर्णय दिला होता.
त्या निर्णयाला आव्हान देत आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिची याचिका न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी फेटाळून लावली आणि वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार कायम ठेवला. तसेच वडिलांना दरमहा दोन वीकेंडला मुलाची प्रत्यक्ष भेट घेण्याची आणि दररोज व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याची परवानगी दिली.
आई आपल्या पतीबद्दलच्या रागामुळे मुलाला वडिलांपासून दूर ठेवत आहे. आईची ही अतिमालकी हक्काची भावना मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी आणि विकासासाठी हानिकारक ठरू शकते. मुलाच्या मनात वडिलांबद्दल किंवा वडिलांच्या कुटुंबाबद्दल कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा नकारात्मकता निर्माण करण्याचा अधिकार आईला नाही, असेही मत न्यायालयाने नोंदवले.