मुंबई: कंत्राटी बसेस भाड्याने घेवून बेस्ट व्यवस्थापन मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे भयंकर चित्र समोर आले आहे. बेस्टच्याच अभियांत्रिकी यंत्रणेने राबवलेल्या मोहिमेत २ हजार ५५३ पैकी ७७४ बसेसचे ब्रेक आणि स्टीअरिग बिघडलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या बिघडलेल्या या बसगाड्या आजही मुंबईच्या रस्त्यांवरून धावत आहेत.
बेस्ट परिवहन विभागात कंत्राटी वेटलिज ऑपरेटरकडून चालविण्यात येणाऱ्या बस गाड्यांमध्ये ब्रेक प्रणाली व स्टिअरिंग यंत्रणेमार्फत चालविण्यात येणाऱ्या गाड्यांच्या तपासणीची माहिती बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी हरकतीच्या मुद्यांच्या अनुषंगाने मागितली होती. त्याला बेस्ट प्रशासनाने तब्बल चार महिन्यानंतर उत्तर दिले.
बेस्टने दिलेल्या माहितीनुसार, बेस्टकडे वेटलीजच्या २५५३ बसेस आहेत. या सर्व बसेसची तपासणी केली असता यंत्रणेला १ हजार ६८५ बसेस सुस्थितीत आढळून आल्या. उर्वरित ८६८ बसेस मध्ये वेगवेगळे दोष आढळून आले आहेत.
मात्र याही बसेस आगारात कार्यरत असल्याने त्या रस्त्यांवर धावत असल्यास प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे नांदगावकर यांचे म्हणणे आहे. शिवाय दोषयुक्त बसेस बाबत बेस्ट प्रशासनाने ठोस काय कारवाई केली याचीही माहिती दिली नसल्याचे नांदगावकर यांचे म्हणणे आहे.
या बिघाडांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले असते. तर गेल्या चार महिन्यात झालेले जीवघेणे अपघात टाळता आले असते आणि अनेकांचे प्राण वाचले असते असा, दावा नांदगावकर यांनी बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीत केला.
बसेसची ब्रेक प्रणाली व स्टिअरिंग यंत्रणेबाबत दुसऱ्यांदा विशेष मोहीम राबवून सखोल तपासणी करण्यात आली. वेट लीज बसेस मध्ये दोष आढळणार नाहीत याची काळजी संबंधित वेटलिज ऑपरेटरने घेण्याचे निर्देशित करण्यात आले आहेत. दोष असलेल्या सर्वच बसमुळे अपघात होत नाहीत असा अजब दावा बेस्ट प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.