मुंबई: मागण्यांची दखल न घेतल्याने मेस्मा लागू असतानाही अखेर गुरुवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने (बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बारा संघटनांची समिती) बेमुदत संप पुकारला. त्यामुळे सुमारे ३० लाख मुंबईकरांना सेवा देणार्या बेस्टच्या २,७६६ बसपैकी केवळ ४८ बस शुक्रवारी रस्त्यावर उतरल्या.
मात्र त्यापैकी काही बसची हवा सोडण्यात आली तर काही बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे दिवसभर मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्ट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.
संपामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे प्रचंड हाल झाले. या संपाचा रिक्षा-टॅक्सी, ओला, उबेर, रॅपिडोच्या चालकांनी घेतला. दुप्पट तिप्पट भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशः लूट केली.
बेस्ट कर्मचार्यांनी वडाळा, कुर्ला, धारावी, मागाठाणे, कुलाबा, गोरेगाव, ओशिवरा, मरोळ अशा मोठ्या आगारांच्या प्रवेशद्वारांवरच ठिय्या मारला. त्यामुळे काही संघटना संपात सहभागी नसतानाही त्यांना सेवा देता आली नाही.
काही ठिकाणी आगारातून बसेस चालविण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याला विरोध करत कामगारांनी भर रस्त्यात बस अडवल्या. सहा ठिकाणी दगडफेक करून हा प्रयत्न हाणून पाडला. त संपामुळे बेस्टचा कोट्यवधीचा महसूल बुडाला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नसून शनिवारीही संप सुरूच राहील.