मुंबई : आयव्हीएफ केंद्रांना मान्यता देताना तज्ज्ञ समित्यांकडून नियमित आणि रँडम तपासण्या केल्या जातात. मात्र, आयव्हीएफ केंद्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी यंत्रणा राबविणार असून वेळप्रसंगी अशा गुन्ह्यांत मकोकासारख्या कडक कायद्यांतर्गत कारवाई करण्याचाही विचार केला जाऊ शकतो, असा इशारा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिला.
बदलापूर येथील बीजांड बेकायदेशीर विक्री प्रकरणाचे बुधवारी विधान परिषदेत गंभीर पडसाद उमटले. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढून बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत केला. अशा रॅकेटवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाघ यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृह (शहरे) विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
ठाण्यातील एका घरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला असता तेथे कोणतेही अधिकृत आयव्हीएफ केंद्र नसल्याचे आढळले. तपासात नाशिकमधील एका नोंदणीकृत आयव्हीएफ केंद्राशी संबंधित डॉक्टरांच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात असल्याचे समोर आले. या प्रकरणात सुमारे दहा महिला पीडित असल्याची माहिती देतानाच याप्रकरणात संबंधित डॉक्टरांना अटक करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
या प्रकरणात करण्यात आलेली सोनोग्राफीही अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले असून संबंधित सोनोग्राफी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच नाशिकमधील नोंदणीकृत आयव्हीएफ केंद्रातून औषधे मिळवून त्यांचा गैरवापर झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. राज्यात सुमारे 860 आयव्हीएफ केंद्रे कार्यरत असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह व आरोग्य विभागाच्या संयुक्त तपासणीतून सर्व केंद्रांची माहिती संकलित केली जाणार आहे. गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करून संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.
सरोगसी कायदा 2021 अंतर्गत 2022 मध्ये राज्य मंडळाची स्थापना करण्यात आली असून परिमंडळ स्तरावर समित्यांमार्फत आयव्हीएफ केंद्रांची तपासणी केली जाते. मात्र या प्रकरणात एकाच महिलेची वारंवार नोंदणी करून वेगवेगळ्या महिलांच्या नावाने बीजांड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यासाठी खोट्या आधार कार्डचा वापर करण्यात आला होता, असे कदम यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तांत्रिक उपाययोजना बळकट केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.