Ayushman Bharat Scheme 
मुंबई

Ayushman Bharat Scheme: एमएमआरमध्ये आयुष्मान भारतला दार बंद? नामांकित रुग्णालयांचा उपचारांना नकार

आमदारांचा विधानसभेत संताप; महिनाभरात तोडगा काढण्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात अनेक नामांकित रुग्णालयांकडून आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे मुंबई एमएमआर क्षेत्रात या योजनेचा कोणताच लाभ होत नसल्याचा आरोप करत शनिवारी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी संताप व्यक्त केला. अखेर महिनाभरात संबंधित आमदारांची बैठक घेत तोडगा काढण्याचे आश्वासन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना द्यावे लागले.

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील आयुष्मान भारत योजनेंतर्गत रुग्णालये उपचार नाकारत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अतुल भातखळकर, संजय केळकर, मनीषा चौधरी, वरुण सरदेसाई, हेमंत ओगले आदी आमदारांनी यावर उपप्रश्न उपस्थित केले.

मुंबई आणि एमएमआर रिजनमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आयुष्मान भारत योजनेतील रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतात. या योजनेमधील रुग्णांना तेथे प्रवेशही दिला जात नाही. त्यामुळे या योजनेचा मुंबई एमएमआर रिजनमध्ये काहीही उपयोग होत नाही, असा आरोप आमदार अतुल भातखळकर आणि वरुण सरदेसाई यांनी केला. त्यावर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी साचेबद्ध उत्तर दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करीत यात सरकारला नेमकी अडचण काय आहे, असा सवाल केला.

आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रचार-प्रसारावर राज्य सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. मात्र अनेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या योजनेंतर्गत समावेशाला नकार देतात.

यामुळे रुग्णांना चांगल्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नाहीत. तसेच या योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे. त्यामुळे आहे त्या सरकारी उपचारांच्या दरावर अधिक रुग्णालयांची नोंदणी करणार का? आणि मुंबई एमएमआर रिजनमध्ये वेगळे दरपत्रक लागू केले जाईल का, असे प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केले.

तर, आमदार संजय केळकर म्हणाले, आम्ही मोठ्या प्रमाणात कॅम्प घेऊन आयुष्मान भारत योजनेचे कार्ड दिले. मात्र कार्ड घेऊन गेलेल्या रुग्णांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाहीत. त्यामुळे आता आम्ही कार्ड देणेच बंद केले आहे. नोंदणी असलेल्या हॉस्पिटलमध्येही अशा कार्डधारक रुग्णांना उभेदेखील केले जात नाही. त्यामुळे एमएमआर रिजनमध्ये दरपत्रक बदलल्याशिवाय चांगले हॉस्पिटल या योजनेत समाविष्ट होणार नाही.

दरपत्रक बदलण्याबद्दल सरकार काय विचार करत आहे, असा सवाल केळकर यांनी उपस्थित केला. सत्ताधारी आमदारांनी घरचा आहेर दिल्यानंतर आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी एमएमआर रिजनमधील नामांकित हॉस्पिटलचा योजनेमध्ये समावेश करण्यासाठी या महिन्याच्या आत बैठक घेऊ, असे आश्वासन सभागृहाला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT