मुंबई : अशोक खरातला भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. हाच न्याय लावायचा असेल तर याच भोंदूबाबासाठी पायघड्या घालणारे मविआ सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहआरोपी करायचे का, असा प्रश्न भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे.
भोंदूबाबांना भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, अशी मागणी संजय राऊत करतात. हाच न्याय लावायचा असेल तर दुष्काळाच्या काळात लोकांना पाणी नसताना या भोंदू बाबासाठी शासन निर्णय (जीआर) काढत महाविकास आघाडी सरकारने पाणी उपलब्ध करून दिले. 2003 मध्ये या भोंदूबाबावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मविआचे सरकार आले. त्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, तेव्हा या भोंदूबाबावर कारवाई करण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही, असेही ते म्हणाले.
आता फडणवीस सरकार आल्यावर या भोंदूबाबावर कारवाई करण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर, उद्धव ठाकरेंना सहआरोपी करायचे का? या प्रश्नाचे राऊत यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावे, असे आव्हान बन यांनी संजय राऊतांना दिले.
दरम्यान, ठाकरे गटात आता संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे वाद सुरू झाल्याचा दावाही नवनाथ बन यांनी केला आहे. त्यामुळेच ठाकरे गटाच्या खासदारांच्या मुंबईतील बैठकीला राऊत यांनी दांडी मारली.