Asha Bhosle Last Conversation
मुंबई : "तीन दिवसांपूर्वी माझं आशाताईंबरोबर बोलणं झालं. त्यांना म्हटलं, काय म्हणताय? त्या म्हणाल्या, "काय म्हणणार आता ९३ आलं? आता जायचं! आता काय भरभरून बोलण्याचे दिवस आहेत का? आपल्या ज्या काही मुलाखती आहेत त्या तुझ्याकडे रेकॉर्ड केलेल्या आहेत ना? मग त्या मला एक-दोन दिवसांत ताबडतोब ऐकायला आणून देशील का?, आता प्रत्येक दिवसच मला महत्त्वाचा आहे." अशा शब्दांमध्ये आशाताईंबरोबर शेवटचा संवाद झाला होता, असे 'पुढारी न्यूज'शी बोलताना ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आशा भोसले यांच्याबरोबरील प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सुधीर गाडगीळ म्हणाले की, आज आशाताईंचे निधन झाले. मला माझ्या घरातलंच कोणीतरी गेले आहे, अशी माझी भावना आहे. मी त्यांच्याशी १९७८ पासून गप्पा मारतोय. देशातील विविध शहरांसह परदेशातील सुमारे २२ सविस्तर मुलाखती मी त्यांच्या घेतल्या आहेत. तसेच वर्तमानपत्रांकरता वेगळ्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्याशी बोलत असताना एक आपुलकी, आत्मीयता होती. मी हे कधीच विसरणे शक्य नाही. नेहमीच असेच वाटले की, आपण घरातील माणसांबरोबरच बोलतोय.
१९७८ मध्ये मी प्रथम आशाताईंबरोबर सविस्तर बोललो. सर्वांत प्रसिद्ध गायिकांपैकी एक असणाऱ्या आशाताईंबरोबर प्रथम कसं बोलायचं, असा प्रश्न होता; पण त्या अत्यंत आपुलकीने म्हणाल्या, चल आपण गप्पा मारूया. त्यामुळे त्यांची सविस्तर मुलाखत घेणे अगदी सोपे झाले. त्या गाणं मस्त गुणगुणायच्या. खाणं आणि गाणं हे दोन आवडीचे विषय होते, असेही गाडगीळ यांनी सांगितले.
आशाताईंचं मला जाणवलेलं वेगळेपण म्हणजे त्या स्वतःला श्रेष्ठ समजत नव्हत्या. एखाद्या घरातल्या माणसाशी बोलते, असं माझ्याशी बोलायच्या. गाणी तर खूप गुणगुणायच्या आणि मला म्हणायच्या, 'अरे हे गाणं आठवतंय का?' म्हणजे त्यांचंच गाणं त्या आठवणीकरता मला विचारायच्या. त्यांना खात्री होती की मला माहीत असेल. 'तुला आवडतं कुठलं माझं गाणं?' म्हटलं, असं कसं सांगणार? तुमची सगळीच गाणी मला आवडणारी आहेत. तरी म्हणे... तर म्हटलं, "कारे दुरावा, कारे अबोला, अपराध माझा असा काय झाला", असे गाणे म्हणतच त्या आठवणी सांगायच्या.
आशाताई परिवारापेक्षा बाहेर जास्त मनःपूर्वक होत्या. घरात त्यांना लतादीदींबद्दल आदर होता, यात शंकाच नाही. 'हृदयनाथच्या गाण्यांच्या चाली म्हणणे याचा कस लागतो' असं त्या म्हणायच्या; पण गप्पा मनमोकळेपणाने त्या बाहेरच्या आमच्यासारख्या जुन्या मंडळींशीच मारायच्या. घरात त्या थोड्या, नाही म्हटलं तरी, जरा त्यांच्या कुठेतरी मनात असेल की दीदी मोठी आहे, त्यामुळे मी काय बोलू, असा प्रश्न त्यांच्या मनात असावा, असेही सुधीर गाडगीळ यांनी नमूद केले.
आशाताई नंबर वन असलेल्या गायिका होत्या. सहजतेने एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात तशा त्या पत्रकारांशी गप्पा मारायच्या. गाण्यातली सहजता तर आपण सगळेजण ऐकून समजू शकता. असा अनौपचारिकपणा सहज निर्माण होत नाही; पण त्यांनी आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि गाण्यातून तो निर्माण केला होता.
त्या मुलाखतीच्या वेळेला कधी कधी म्हणायच्या की, मुलाखत आपण थोड्या वेळाने देऊ. 'तू आधी तुझा कायम तो झब्बा (गुरु शर्ट) घालून बसतोस तो घरी जाऊन बदलून टाक आणि शर्ट घालून ये.' 'आता तुम्ही एवढी ऑर्डर करताय तर रंग कुठला असावा तेही सांगा.' 'दोन-तीन शर्ट घेऊन ये, त्यातला मी सांगते तो घाल.' असं नातं त्यांनी निर्माण केलेलं होतं. इतकं सहज आणि घरगुती नातं निर्माण करणाऱ्या, एवढ्या महान असूनसुद्धा आमच्यासारख्या छोट्या माणसांशी कनेक्ट होणाऱ्या दुसऱ्या कोणाला मी पाहिलं नाही, असेही सुधीर गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.