Amol Mitkari on Finance Ministry Maharashtra : "राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्यची धुरा सोपविली होती. आता दादानंतर आदरणीय सुनेत्रा वहिनीकडे ही जबाबदारी अर्थसंकल्प मांडल्यावर देण्याची भावना माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर बोलून दाखविली होती. या खात्यावर हक्कही राष्ट्रवादीचाच आहे !राज्यभरातील लाखो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही आपल्या वचनपुर्तीची अपेक्षेने वाट पाहत आहेत, "अशी सूचक पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विशेष म्हणजे बुधवार, ५ ऑगस्ट रोजी मिटकरी यांनी मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी केलेली पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, महायुती सरकार स्थापन होताना राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय अजितदादांकडे अर्थ खात्याची धुरा सोपविली होती,आणि आदरणीय दादांनी सुद्धा ती समर्थपणे पेलली.मात्र दादानंतर आदरणीय सुनेत्रा वहिनीकडे ही जबाबदारी अर्थसंकल्प मांडल्यावर देण्याची भावना माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर बोलून दाखविली होती व तसा त्या खात्यावर हक्कही राष्ट्रवादीचाच !राज्यभरातील लाखो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही आपल्या वचनपुर्तीची अपेक्षेने वाट पाहत आहेत.
अजितदादांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात मात्र प्रचंड वेदना आहे. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही महायुती मजबूत करण्यासाठी सातत्याने जबाबदारीने साथ दिली आहे. त्यामुळे दिलेला शब्द पाळला जाणे ही केवळ राजकीय बाब नसून विश्वास, पारदर्शकता आणि परस्पर सन्मानाची बाब आहे.माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्र विनंती आहे की, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करून अर्थखाते पक्षाकडे सोपवावे. जेणेकरून महायुतीतील विश्वास अधिक दृढ होऊन कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असेही मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनीही पक्षाच्या स्वाभिमानासाठी कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत ठामपणे पोहोचविण्यात पुढाकार घ्यावा. दिलेला शब्द पाळला जावा, एवढीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.शब्दाला किंमत असते. तो पाळला गेला तर विश्वास वाढतो; आणि विश्वास टिकला तरच युती अधिक मजबूत होते. आपल्या निर्णयाकडे तमाम राज्याचे लक्ष लागून आहे, असे आवाहनही मिटकरी यांनी आपल्या पोस्टमधून करुन दिले आहे.