मुंबई : अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नावदेखील बदलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाने तातडीने अधिसूचना जारी करून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘अहिल्यानगर रेल्वे स्थानक’ असे केल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे यासाठी प्रयत्नशील होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यातच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्र पाठवून रेल्वे मंत्रालय आणि त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर रेल्वेस्थानक असे करण्याबाबत विनंती केली होती.