Aaditya Thackeray On Doctor Assault: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या मारहाण प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'मिंधे टोळीची गुंडागर्दी सगळीकडे सुरू आहे,' असे म्हणत त्यांनी या प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना तातडीने बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल देखील एक मोठा आणि खळबजनक दावा केला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे अधिवेशन असून ऑपरेशन देवेंद्रमध्ये काही भाजप नेतेही सामील असल्याचा दावा केला.
डोंबिवलीतील घटनेचा उल्लेख करत आदित्य ठाकरे म्हणाले की, "डॉक्टरांनी मूल प्रिमॅच्युअर असल्याचे आणि निकूची (NICU) गरज असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांच्यावर हात उचलणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. भाजपची आवडती 'मिंधे टोळी' आता गुंडागर्दीवर उतरली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री गप्प का? त्यांचे हात कोणी बांधले आहेत का? अशा प्रकारची मस्ती खपवून घेतली जाणार नाही."
आदित्य ठाकरेंनी 'ऑपरेशन देवेंद्र'चा उल्लेख करत म्हटले की, यात भाजपचे लोकही सामील आहेत. हे सरकारचे शेवटचे अधिवेशन असून, यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना दिल्लीत बोलवले जाईल, असा दावाही त्यांनी केला. या सर्व प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.
राम मंदिरातील दानपेटीच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले, "राम मंदिर लुटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस हे सरकार दाखवणार का? हनुमानजींसमोर नाचवणे आणि स्वतःला देव समजणे ही यांची संस्कृती झाली आहे का? रामावर विश्वास ठेवणाऱ्या हिंदूंचाही या सरकारने विश्वासघात केला आहे. राम मंदिर चोरीवर भाजपने उत्तर द्यावे."
राज्य सरकारचा कारभार आणि पावसाळ्यातील तयारीवरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, "पाऊस उशिरा येऊनही रस्त्यांची कामे पूर्ण नाहीत, झाडांचे ट्रिमिंग झालेले नाही. हे सरकार रिव्हर्स गिअरमध्ये चालले आहे. सरकारकडे चार चालक आहेत, पण त्यांना नक्की कुठे जायचे आहे हेच माहिती नाही. 'एआय'ने (AI) प्रश्न सोडवू अशी शेखी मिरवणारे हे सरकार सध्या 'एआय' आणि 'नॅचरल स्टुपिडिटी'मध्ये अडकले आहे."