हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा शिवारात भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. १४) दुपारी बाराच्या सुमारास घडली. अविनाश बाबुराव जाधव (वय 23, रा. पेवा, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्हयातील पेवा येथील अविनाश जाधव व त्याचा चुलत भाऊ देवानंद संजय जाधव हे दोघे जण पुणे येथे खासगी कंपनीमध्ये कामाला आहेत. कंपनीमध्ये सुट्टी घेऊन ते दुचाकीवरून गावाकडे पेवा येथे निघाले होते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वारंगाफाटा शिवारातील भवानी मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. यात अविनाश याचा जागीच मृत्यू झाला. तर देवानंद गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रकसह पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी देवानंद यास डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाने ट्रकचा पाठलाग करून आखाडा बाळापूरापासून काही अंतरावर असलेल्या सिंचन वसाहती जवळ ट्रक पकडला. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. तर डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहावर उत्तरीय तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा