पूर्णा: शहर व तालूका परिसरात मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर कमालीचे गडगडले आहेत. फळ आणि पालेभाज्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. तालुका भागातील पांगरा, मरसूळ, पिंपळा लोखंडे, धटाकळी, गोविंदपूर, बरबडी, कानडखेड, कान्हेगाव, खुजडा, ममदापूर, गणपूर सुकी, माटेगाव, सुरडवाडी, आहेरवाडी, कावलगाव, कलमुला, रुंज, पेनूर, धानोरा यासह आदी गावांतील शेतकरी पारंपरिक व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर भाजीपाला लागवड करतात.
यंदा फळे पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने आवक वाढून बाजारात दर कोसळले आहेत. यातच, संकरीत भेंडी व पडवळ कद्दू लागवड क्षेत्र वाढले आहे. परिणामी, भेंडी उत्पादनात मोठी वाढ होवून चंगळ उत्पादन वाढीमुळे भाजी मंडईत बंपर आवकीने भाव उतरले. सध्या भेंडी प्रति किलो १० रुपये तर दुधी कदू २ रुपये प्रति नगाने विकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा भाजीपाला तोडणी करणं देखील कठीण झाला आहे. भावच नसल्याने भेंडी कदू गुरा ढोरांना खावू घालण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर इतरही भाजीपाल्याचे दर उतरले आहेत. त्यातून काढणी वाहतूक खर्च निघणे मुश्कील झाले आहे.असे असले तरी बाजारात बसून विकणारे मात्र चढ्या दराने भाजीपाल्याची विक्री करत आहेत.
उत्पादक शेतकऱ्यांना कृषी खात्याने प्रोत्साहनपर अनुदान द्यावे
दरम्यान, भाजीपाला लागवड करून त्याचे उत्पादन घेण्यासाठी बियाणे, खते, रासायनिक फवारणी करण्यासाठी मोठा खर्च येतो. आवक वाढून बाजारात दर कोसळतात तेव्हा भाजीपाला लागवड करणं "नको रे बाबा"म्हणून शेतकरी वैतागून जातात. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यावेळी भाजीपाला उत्पादकास उभारी मिळावी यासाठी कृषी विभागा मार्फत संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे; अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.