The body of a youth who drowned in the river was brought to the District Collector's Office np88
परभणी, पुढारी वृत्तसेवा : शेतात ई पीक पाहणी करण्यासाठी गेलेला तालुक्यातील धारणगाव येथील २२ वर्षीय तरुण दुधना नदीपात्रात रविवारी बुडाला होता. सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह सापडला. तद्नंतर संतप्त झालेल्या धारणगाव ग्रामस्थांनी तरुणाचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणत समसापूर बंधारा फोडून कोल्हापुरी बंधारा बांधून नदीपलीकडे जाण्यासाठी रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी केली. प्रशासनाच्या आश्वासनानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून मृतदेह उचलण्यात आला.
रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धारणगाव येथील गजानन आश्रोबा डुकरे (वय२२) हा शेतात ई पीक पाहणी करण्यासाठी जात होता. नदी ओलांडून जात असताना समसापूर बंधाऱ्याच्या बँक वाटरमध्ये तो बुडाला होता. तद्नंतर त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले होते. रविवारी शोध घेतल्यानंतरही गजानन डुकरे सापडला नव्हता, सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला.
नंतर संतप्त झालेल्या धारणगाव ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. गजानन डुकरे हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत न्याय मिळेपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.
निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सकाळी ११ वाजता धारणगाव ग्रामस्थांसोबत चर्चा करून या विषयावर ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे लेखी पत्र ग्रामस्थांना दिले. कोल्हापुरी बंधारा व नदीपलीकडे जाण्यासाठी रस्त्याच्या मागणीचाही सहानुभूतीने विचार करू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मृतदेह उचलला.
मागील दहा वर्षांपासून धारणगाव ग्रामस्थ कोल्हापुरी बंधारा व नदीपलीकडे जाण्यासाठी रस्ता करून द्यावा, या मागणीसाठी संघर्ष करत आहेत. प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज विनंती करूनही प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गजानन डुकरे या तरुणाचा मृत्यू केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप धारणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर करण्यात आला आहे.
समसापूर येथील बंधाऱ्याच्या बॅक वॉटरचा उसावा साटला, धरणगावपर्यंत जातो. यामुळे येथील दुधना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असते. धारणगाव ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात जमीन ही नदीपलीकडे असल्यामुळे त्यांना शेतात जाण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.