परभणी : सुभाष कच्छवे
रविवारी ३० ऑगस्ट रोजी खा. संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा घेवून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.राजेश विटेकर व शिंदेच्या शिवसेनेचे आ. सईद खान हे एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनाही आपला पक्ष जिल्ह्यात बळकट करायचा आहे, यामुळे येणार्या काळात महायुतीमध्ये राजकीय ताणाताणी वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या परभणी जिल्ह्यात आजतागायत शिंदेसेनेला पाय रोवण्यात अपयश आले होते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिंदेसेनेचे आ.सईद खान हे विजयी झाले. तदनंतर खा. संजय जाधव यांनी ठाकरेंच्या शिवसेनेशी काडीमोड घेत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आ. डॉ. राहुल पाटील यांना आव्हान देण्याची भाषा करत खा. जाधव यांनी शेतकरी-युवासंवाद मेळाव्याच्या निमित्ताने स्टेडियम मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
जरांगे यांनी खा. जाधव यांना मेळाव्याच्या दिवशीच फोन करून शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी केली होती, परंतु नागरिक सभास्थळी आल्यामुळे व मेळावा जवळपास २ महिन्यापासून नियोजित असल्यामुळे मेळावा ऐनवेळी रद्द करता येणार नाही, अशी भूमिका खा. संजय जाधव यांनी घेतली होती. तदनंतर सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवत एक मराठा-लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. मेळाव्याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना खा. जाधव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मेळावा यशस्वी करून दाखवला.
जिल्हाभरात शिंदेंच्या शिवसेना वाढीसाठी खा. जाधव पुढाकार घेवू शकतात. याचवेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनाही जिल्हयात शतप्रतिशत भाजपा करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ.राजेश विटेकर यांनाही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवत जनाधार वाढवायचा आहे. शेतकरी मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात सोनपेठ येथे पार पडलेल्या बैठकीत आ. सईद खान यांनी राजेश विटेकर हे महायुतीचे आमदार असून ते आमच्याच विरोधात कारस्थान करत असतात, असा आरोप केला.
आ. राजेश विटेकर यांनी आ. सईद खान यांचा हे कालचं कारटं लईच बोलतय असा पलटवार करत टोला लगावला. एकंदरीत महायुतीतील नेत्यांमध्येच राजकीय कलगीतूरा रंगताना दिसून येत असून आगामी काळात महायुतीमध्ये राजकीयदृष्ट्या ताणाताणी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.