भारनियमन व वीज पुरवठ्याच्या मुद्द्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांना आ. गुट्टेंनी जाब विचारला. pudhari photo
परभणी

Gangakhed power supply issue : महावितरणच्या अधिकाऱ्यांना आ. गुट्टेंनी धरले धारेवर

भारनियम, वीज पुरवठा समस्यांवर आढावा बैठकीत व्यक्त केला संताप

पुढारी वृत्तसेवा

गंगाखेड : शेतकऱ्यांना नियमित व दर्जेदार वीजपुरवठा मिळत नसल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला असून उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारत चांगलेच धारेवर धरले.

तालुक्यातील बनपिंपळा येथे आयोजित महावितरणच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. यावेळी आ.गुट्टे यांनी शहर व ग्रामीण भागातील अनियमित वीजपुरवठा, वारंवार होणारे भारनियमन, कृषीपंपांना अपुरा वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मर बिघाड, डीपी जळणे व तुटलेल्या केबल्समुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

भारनियमन हा आता केवळ तांत्रिक विषय राहिला नाही, तर तो शेतकऱ्यांच्या अश्रूंचा आणि सर्वसामान्यांच्या त्रासाचा बनला. वीजपुरवठा हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून त्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. मनुष्यबळ, निधी व साहित्याची कमतरता ही कारणे वारंवार सांगण्याऐवजी वरिष्ठ स्तरावर केलेल्या पाठपुराव्याची माहिती द्यावी, तसेच फ्यूज कॉल सेंटरवर आलेल्या प्रत्येक तक्रारीचे 24 तासांत निराकरण व्हावे, असे निर्देशही दिले.

सायंकाळच्या अतिरिक्त भारनियमनामुळे शेतीसह जनावरांची देखभाल, दूध काढणे, स्वयंपाक व घरगुती कामांवर परिणाम होत असल्याचे नमूद करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. बैठकीस महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, गुट्टे मित्रमंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT