चारठाणा : सेलू तालुक्यातील निरवाडी येथे जलसंधारण विभागामार्फत उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजय डासाळकर यांनी या प्रकरणाची तांत्रिक आणि आर्थिक चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे.
नेमका प्रकार काय?
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने निरवाडी येथे हा कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा, विशेषतः मातीमिश्रित वाळूचा वापर केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनही कामाचा दर्जा असमाधानकारक असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित विभागाकडून दुर्लक्ष
स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही संबंधित विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अभियंता आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने हे काम थातूरमातूर करण्यात आल्याचा आरोप चिकलठाणा गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अजय डासाळकर यांनी केला आहे.
पाणी साठवणुकीवर परिणाम होण्याची भीती
पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु अद्यापही काम अपूर्ण आहे. यामुळे आगामी काळात पाणी साठवणूक आणि सिंचनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व बाबींचा विचार करता, तातडीने या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार व संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अजय डासाळकर यांनी केली आहे. या कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी न झाल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास, लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.