आनंद ढोणे
पूर्णा : तालुक्यातील गौर येथे वडार समाजासाठी स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेहाची मोठी अवहेलना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अद्याप सुटलेला नाही, ज्याचा प्रत्यय शुक्रवारी (१९ जून) येथील एका दुर्दैवी घटनेतून आला.
नेमकी घटना काय?
गौर येथील वडार समाजातील १२ वर्षीय मुलगी सरस्वती सुरेश पवार हिचा उष्माघातामुळे पहाटे २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी गावात हक्काची जागा नसल्याने संतप्त आणि दुःखी कुटुंबीयांनी मृतदेह तिरडीवर ठेवून थेट पूर्णा तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत मृतदेह कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठेवावा लागला. "आमच्या समाजाला स्मशानभूमी नाही, तर आम्ही अंत्यविधी कुठे करायचा?" असा आर्त सवाल करत नातेवाईकांनी यावेळी हंबरडा फोडला.
प्रशासनाची तत्काळ दखल
हा प्रकार पाहून महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर, आडगाव-सुगाव येथील गट क्र. २२/११६/२०१ मधील २० गुंठे जागा अंत्यविधीसाठी देण्याचे लेखी आदेश तहसीलदारांनी दिले. यानंतरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील प्रश्नासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष झाल्याने आणि एका निष्पाप मुलीच्या मृतदेहाला अशा प्रकारे वणवण भटकंती करावी लागल्याने सर्वस्तरातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.