ताडकळस, मानवत; पुढारी वृत्तसेवा: ताडकळस व परिसरातील कळगाव, कळगाववाडी, धानोरा काळे, बानेगाव, महागाव, फुलकळस, खंडाळा, माखणी, खाबेगाव, एकरुखा, निळा, मु॑बर, माहेर, सिरकळस, बलसा बु महातपुरी, येथे सोमवारी (दि. २७) पहाटे ४ च्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले. हातातोंडाशी आलेला कापसाचे व उसाचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला ऊस, तूर, ज्वारी पिके जमीनदोस्त झाली आहेत. Parbhani Heavy Rain
शेतकऱ्यांनी महिन्याभरापूर्वी हरभरा पेरणी केली होती. त्या पेरणीला पावसाचा फटका बसला असून दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना विमा व दुष्काळाची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी दिवाळी साजरी करता आली नाही. जवळ काही पैसे होते त्यातून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पेरणीसाठी पैसे खर्च केले. दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शासनाने तत्काळ रब्बीचा विमा मंजूर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असी मागणी ताडकळस व परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. Parbhani Heavy Rain
मानवत तालुक्यातील कोल्हा व ताडबोरगाव सर्कलमध्ये रविवार (दि.२६) मध्यरात्रीनंतर पडलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले. अनेक शेतकऱ्यांचे ज्वारी व तुरीचे पीक भुईसपाट झाले असून मोठे नुकसान झाले आहे .
तालुक्यात रविवारी रात्री साडे बाराच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस तब्बल तीन ते चार तास होता. शेतातील रब्बीचे पिके गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचा वेचणीसाठी आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आधीच सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. त्यातच या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आणखी नुकसानत भर पडली. संपूर्ण पावसाळ्यातला हा पहिला मोठा पाऊस होता. नदी नाल्याला पूर येऊन शेतातील बांध भरले. या पावसामुळे विहिरीतील पाणी उपसे बंद झाल्यामुळे थोडासा पाणीटंचाईला दिलासा मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात कही खुशी कही गम चे वातावरण आहे.
मानवत तालुक्यात सरासरी ५९.२ मिमी पावसाची नोंद तहसील पर्जन्यमापकावर झाली असून मानवत विभागात ५८.५ , कोल्हा विभागामध्ये सर्वाधिक ७६.८, ताडबोरगाव विभागात ६९ तर रामपुरी बु विभागात ४१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथे अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांना हातात तोंडाशी आलेला कापूस तूर, ज्वारी, हरभरा, भाजी पाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
हेही वाचा