आनंद ढोणे
पूर्णा : तालुका परिसरात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने संपूर्ण शिवारातील सोयाबीन पिके सुकून वाळू लागली आहेत. जमिनीतील ओलावा पूर्णपणे नष्ट झाल्याने खरीप हंगाम वाया जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला असून शेतकऱ्यांसमोर मोठे कृषी संकट उभे ठाकले आहे.
तालुक्यातील कोरडवाहू भागातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आणि तूर ही पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून एकदाही दमदार पाऊस झाला नाही. अल्पशा पावसाच्या ओलाव्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मध्यंतरी अधूनमधून हलक्या सरी कोसळल्याने पिकांनी कशीबशी तग धरली; मात्र फुलोरा आणि शेंगा धारण करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने उघडीप दिल्याने झाडांसह फुले आणि शेंगा करपून पिकांनी अक्षरशः माना टाकल्या आहेत.
सध्या मे महिन्यातील उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून जमिनी एवढ्या तापल्या आहेत की पायही पोळत आहेत. कोरडा दुष्काळ पडण्याची नैसर्गिक चिन्हे स्पष्ट दिसत असून दिवसेंदिवस कडक ऊन आणि रात्री स्वच्छ आकाश असल्याने पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
पावसासाठी शेतकरी गावोगावी देवाधर्माला साकडे घालत "धोंडी धोंडी पाणी दे" अशी प्रार्थना करत आहेत. तरीही वरुणराजा प्रसन्न होत नसल्याने विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळीही झपाट्याने खालावत आहे. पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून जनावरांच्या चारा-वैरणीचाही प्रश्न गंभीर बनणार आहे.
पावसाअभावी खरीप पिके वाळत असल्याने पेरलेल्या बियाण्याइतकेही उत्पादन मिळण्याची शक्यता उरलेली नाही. अशी गंभीर परिस्थिती असतानाही सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
सुकून वाळत चाललेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे निवेदने देऊन करत आहेत. मात्र महसूल आणि कृषी विभागाला अद्याप कोरड्या दुष्काळाच्या पंचनाम्याचे आदेश मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सर्व पिके पूर्णपणे वाया गेल्यानंतरच सरकारला जाग येणार का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
मागील खरीप हंगाम २०२५ मध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. कुठे पूराच्या पाण्याने तर कुठे अतिवृष्टीने पिके वाहून गेली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही एआयसी कंपनीकडून नुकसानभरपाई मिळालेली नाही. लोकप्रतिनिधी आणि सरकारकडूनही याबाबत ठोस पाठपुरावा होत नसल्याने २०२५ च्या पीकविमा भरपाईची आशा मावळत चालल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
गतवर्षी अतिवृष्टीने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला, तर यंदा पावसाअभावी खरीप वाया जात आहे. सलग दोन वर्षांच्या नैसर्गिक संकटामुळे यंदाच्या बैल पोळा सणावरही कोरड्या दुष्काळाचे सावट दाटले आहे. येत्या १० सप्टेंबर रोजी बैल पोळा सण साजरा होणार असताना शिवारातील वाळणारी पिके पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पेरणीसाठी घेतलेले आडत व्यापारी आणि खासगी सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, घरखर्च, उपचार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, या चिंतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.