Parbhani Selu Loan Waiver Issue
सेलू (जि. परभणी) : शेतकरी कर्जमुक्ती संदर्भातील शासनाच्या २ जून २०२६ रोजीच्या आदेशाचा निषेध करत किसान सभेच्या वतीने गुरुवारी (दि.११) सेलू तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी कार्यकर्त्यांनी शासन आदेशाची प्रतीकात्मक होळी करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी २८ व २९ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथील जबलपूर महामार्गावर हजारो शेतकऱ्यांनी महामुक्काम आंदोलन केले होते. हे आंदोलन किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, राजू शेट्टी, रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले होते.
आंदोलनानंतर राज्य सरकारने ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमुक्तीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. मात्र, २ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशाद्वारे लाखो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. या आदेशाचा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सुरुवातीपासूनच निषेध केला असून राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्या पार्श्वभूमीवर ११ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात आले. सेलू तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी “फसव्या शासन आदेशाचा धिक्कार असो”, “अटी-शर्तीविना २०१२ पासूनची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करा”, “२ जूनचा जीआर मागे घ्या”, “फडणवीस सरकार होश में आओ” आणि “संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे” अशा घोषणा दिल्या.
यावेळी कॉम्रेड रामेश्वर पौळ यांच्या नेतृत्वाखाली शासन आदेशाची होळी करण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार गजानन इनामदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे पाटील, दत्तुसिंग ठाकूर, उद्धव पौळ, सुभाष शहाणे, रोहीदास हातकडके, बाळू पौळ, रंगनाथ ताठे, शिवाजी बापू पौळ, गणपत गोंडगे, शांतीराम पौळ, धोंडीराम पातळे, नारायण पवार, भगवान वाव्हळ, पंडित आवटे, सचिन गाडेकर, राजेभाऊ पौळ, दत्ता बादाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.