Parbhani News: Protest outside the Vice-Chancellor's office demanding a wage hike for laborers
परभणी, पुढारी वृत्तसेवा: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रोजंदारीवर कार्यरत असणाऱ्या कुशल आणि अकुशल कामगारांच्या वेतन दाबाबत बुधवारी (दि. १५) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाकडून कामगारांचे होत असलेले आर्थिक शोषण थांबवून त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन मिळावे, अशी मागणी यावेळी केली.
विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या कुशल कामगारांना ४५८ आणि अकुशल कामगारांना ३९० प्रति दिवस या दराने वेतन दिले जात आहे. वास्तविक पाहता, महाराष्ट्र शासन व सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या नियमानुसार किमान वेतन दर अधिक असणे आवश्यक आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे चालकांसाठी कामगारांसाठी मोटार वाहतूक ७२५, कुशल ५७४, सफाई कामगारांसाठी ६५२ तर शेती आहे. कामासाठी ३९० प्रति दिवस वेतन मिळणे बंधनकारक आहे. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने कामगारांचे सर्व कायदेशीर नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने कमी वेतन दिल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या अन्यायाविरोधात संतप्त झालेल्या कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसत थेट कुलगुरूंचे कार्यालय गाठले आणि ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन कामगार आयुक्त कराड यांनी तातडीने आंदोलन स्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलनकर्ते कामगार आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात मध्यस्थी केली. तसेच प्रचलित लेबर कायद्यानुसार (कामगार कायदा) कुशल व अकुशल कामगारांना हक्काचे वेतन द्यावेच लागेल, असे स्पष्ट निर्देश देणारे पत्र कामगार आयुक्तांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे. कामगार आयुक्तांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर विद्यापीठाने आंदोलकांना लेखी पत्र दिले. त्यानुसार येत्या १ ऑगस्टपासून वेतन वाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.