परभणी : पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागाने महसूल तसेच प्रवासी सेवेत यंदा नवा विक्रम प्रस्थापित केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत असताना परभणी विभागाच्या विशेष बससेवेचा भाविकांना मोठा लाभ झाला.
या सेवेमुळे अवघ्या २० ते ३० जुलै दरम्यान तब्बल ८ कोटी १७ लाख ९ हजार ४२८ रुपयांचे उत्पन्न विभागाच्या तिजोरीत जमा झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ४ लाख रुपयांनी अधिक महसूल मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक संदीप पडवळ यांनी दिली.
यंदाच्या आषाढी वारीसाठी परभणी विभागाने सुरुवातीला २५० विशेष बसेसचे नियोजन केले होते. मात्र, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रत्यक्षात २७२ बसेस सेवेत उतरविण्यात आल्या. या बसेसने ९६४ विशेष फेऱ्या पूर्ण करत ३ लाख १० हजार ७६० किलोमीटरचा प्रवास केला.
वेळेचे काटेकोर नियोजन, अतिरिक्त फेऱ्या तसेच चालक-वाहकांच्या तत्पर सेवेमुळे ७४ हजार ४७७ भाविकांनी एसटीच्या माध्यमातून सुरक्षित प्रवास केला. वारी दरम्यान १ हजार ३१४ लहान मुले, १३ हजार ९१४ महिला, अमृत योजनेतील २६ हजार ५८१ नागरिक, ८ हजार ११६ ज्येष्ठ नागरिक तसेच २ हजार ७९२ इतर प्रवाशांनी एसटीने प्रवास केला.
महिलांसाठीच्या सवलतीच्या योजनेला मिळालेला प्रतिसाद तसेच ज्येष्ठ नागरिकांचा वाढता सहभाग यामुळे एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला. आषाढी वारी दरम्यान चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, तांत्रिक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत ही सेवा सुरळीत ठेवली. महिलांना ५० टक्के भाडे सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास तसेच दिव्यांगांना सवलत देऊनही विभागाने १ कोटी ८८ लाख २५ हजार ९५० रुपयांचे उत्पन्न मिळविले.
गंगाखेड आगार ठरले अव्वल
परभणी विभागातील आगारनिहाय आकडेवारीत गंगाखेड आगाराने सर्वाधिक प्रवासी वाहतूक केली. गंगाखेड आगारातून ८५ बसद्वारे ९,१७० प्रवासी पंढरपूरला रवाना झाले. त्यापाठोपाठ परभणी आगारातून ८२ बसद्वारे ८,५३७, वसमत आगारातून ५९ बसद्वारे ८,३०२, जिंतूरमधून ६४ बसद्वारे ८,१६१, हिंगोलीतून ५८ बसद्वारे ६,७००, पाथरीतून ६० बसद्वारे ६,१९८, तर कळमनुरी आगारातून ३७ बसद्वारे ५,६२५ प्रवाशांनी विठुरायाच्या दर्शनासाठी प्रवास केला.