परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ संचालक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित ८ मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ. सुरेश वरपूडकर, आ.राजेश विटेकर, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे हे दिग्गज बिनविरोध निवडून आले असून या निवडणुकीत खासदार व आमदार राहिलेल्या अनेक लोकप्रतिनिधींनी माघार घेतल्याचे दिसून आले.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालकपदाच्या २१ जागा निवडून देण्यासाठी दि.१९ जुलै रोजी मतदान होणार आहे. परंतु तब्बल १३ संचालक बिनविरोध निवडून आल्यामुळे निवडणूक मतदारांच्या दृष्टीने रंगतदार होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परभणी जिल्हयातील मानवत, पूर्णा तर हिंगोली जिल्हयातील वसमत, हिंगोली, कळमनूरी या प्राथमिक कृषी पतपूरवठा, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मतदारसंघात निवडणूक होणार आहे.
अनूसूचीत जाती, अनूसूचीत जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर शेती संस्था मतदारसंघात निवडणूक होणार असून अनेकांची बिनविरोध निवडून येण्याचे स्वप्न भंगल्यामुळे त्यांना निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे. प्राथमिक कृषी पुरवठा मतदारसंघ परभणी तालुक्यातून माजी आ. सुरेश वरपूडकर बिनविरोध निवडून आले असून त्यांचे पूत्र समशेर वरपूडकर यांनी या मतदारसंघातून गुरूवारी माघार घेतली आहे. जिंतूर तालुका मतदारसंघातून माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर बिनविरोध निवडून आले असून तेथे त्यांचे बंधू गंगाधर कदम-बोडर्डीकर यांनी माघार घेतली आहे.
पालम तालुक्यातून तुषार दुधाटे यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे ते यापुर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. गंगाखेड तालुक्यातून आ. रत्नाकर गुट्टे यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. मानवत तालूका मतदारसंघातून जयश्री जाधव या एकमेव महिला उमेदवाराने माघार घेतली असून तेथे अमोल कदम, आकाश चोखट हे निवडणुक रिंगणात राहिले आहेत. पूर्णा तालुका मतदारसंघातून चार उमेदवारांनी माघार घेतली असून तेथे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेले आहेत. पाथरी तालुका मतदारसंघातून तीन उमेदवारांनी माघार घेत, येथेही निवडणूक होणार आहे. सेलू तालुका मतदारसंघातून राजेंद्र लहाने यांनी माघार घेतल्यामुळे पालकमंत्री मेघना बोर्डीकर बिनविरोध निवडून आल्या.
अनूसूचीत जाती जमाती मतदारसंघात चार उमेदवारांनी माघार घेतली असून तब्बल १४ उमदेवार रिंगणात आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून ११ उमेदवारांनी माघार घेतली असून १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये बँकेचे माजी संचालक स्वराजसिंह परिहार, दत्ता मायंदळे यांचा समावेश आहे. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून ९ उमेदवारांनी माघार घेतली असून बँकेचे माजी संचालक भगवान वाघमारे हे बिनविरोध निवडून आले आहेत.