मानवत : शेती कर्जाच्या तणावातून एका महिलेने शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना मानवत तालुक्यातील साखरेवाडी शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीमा मधुकर साबळे (वय ४७, रा. साखरेवाडी, ता. मानवत) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पती संतोष मधुकर साबळे यांनी याबाबत मानवत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. दि. १५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास साखरेवाडी शिवारातील शेतातील विहिरीत त्यांनी उडी घेतली. प्राथमिक माहितीनुसार, शेतीचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबांवरील आर्थिक ताण पुन्हा एकदा समोर आला असून परिसरात शोककळा पसरली आहे.