Parbhani BJP NCP stand political news
सुभाष कच्छवे
परभणी : जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगणाऱ्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर तोंडघशी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजप विरोधात सर्वच राजकीय पक्ष एकवटल्यामुळे आजघडीला जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष बनूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या. त्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १५, ठाकरे शिवसेनेला ६, शिंदे शिवसेनेला ५, काँग्रेसला ३ तर एका ठिकाणी अपक्षाला संधी मिळाली. निवडणूक निकालानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीने भाजप जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल. राष्ट्रवादी काँग्रेसला झेडपीच्या सत्तेत घेण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्ट केले होते.
तदनंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या भूमिकेला डावलत वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सोबत घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्त् ोपासून दूर ठेवण्याचे मनसुबे रचले होते, त्याच राष्ट्रवादी काँग्रेसची मनधरणी करताना आजघडीला भाजप दिसत असून बोर्डीकर यांच्या विरोधात सारेच राजकीय पक्ष एकवटल्यामुळे जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष बनूनही भाजपची अवस्था ातातून सत्ता जाते की काय? अशी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राजेश विटेकर, माजी आ. विजय भांबळे यांनी कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग बांधला असून केवळ पाच जागा जिंकणाऱ्या शिंदे सेनेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद बहाल करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दोन पावले मागे येत स्वतः साठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद घेणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेलाही ६ जागांवर सभापतीपद मिळणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बोर्डीकर विरोधकांची बैठक पार पडली असून एका अपक्षाच्या मदतीने बहुमताचा जादुई आकडा गाठण्याचे नियोजन झाल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषद निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारात बहुतांश ठिकाणी तुल्यबळ लढती झाल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एकमेकांवर आरोपाची राळही उडवली होती. पालकमंत्री बोर्डीकर यांनी आ. विटेकर यांचे होमपीच असलेल्या सोनपेठमध्ये जाऊन विटेकर यांच्यावर बोचरी टीकाही केली होती. पालकमंत्री बोर्डीकर आणि माजी आ. विजय भांबळे, आ. राजेश विटेकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेच, परंतु वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या आदे शावरून महायुतीतील तीनही घटक पक्ष झेडपीच्या सत्तेत सहभागी होतील, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे परभणीत राजकीय भूकंपाचेच संकेत मिळत आहेत.
भाजपच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष एकवटल्यामुळे जिल्हा परिषद स्थापनेनंतर प्रथमच जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांचे स्वप्न भंगणार काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारणाऱ्या भाजपवर आज त्यांचीच मनधरणी करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने घेत-लेल्या भूमिकेमुळे भाजपची फरफट होताना दिसून येत आहे.
झेडपीचे सदस्य ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सारे विरोधक एकवटल्यानंतर शिंदे शिवसेना, ठाकरेंची शिवसेना व अन्य जिल्हा परिषद सदस्यांना ठाणे येथे ठेवण्यात आले आहे. एकंदरीत नवीन राजकीय समीकरणांमुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवा रंग भरला आहे.
भाजपच्या विरोधात जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकवटल्यामुळे राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या गोटातही खळबळ माजली असून भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांना समाज माध्यमांवर पोस्ट करत भाजप, शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती होणार असल्याचे जाहीर करावे लागले आहे.