Ncmc Card Recharge
जिंतूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) रिचार्जची सुविधा आता थेट एसटी बसमधील वाहक अर्थात कंडक्टरकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
सध्या एनसीएमसी कार्डमधील शिल्लक रक्कम संपल्यानंतर रिचार्ज करण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना आगार किंवा अन्य केंद्रांवर जावे लागत होते. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. आता प्रवासादरम्यानच कंडक्टरकडून कार्ड रिचार्ज करता येणार असल्याने ही धावपळ कमी होण्याची शक्यता आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आदी प्रवाशांना एसटीच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्डचा वापर करता येतो. कार्डमुळे प्रवासाची प्रक्रिया अधिक सुलभ होत असून, पास किंवा इतर कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरजही कमी होते.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन एनसीएमसी कार्ड काढताना १९९ रुपये तसेच लागू जीएसटी आकारला जातो. आधारकार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सादर केल्यानंतर एसटी आगारातून कार्ड मिळू शकते. विद्यार्थ्यांनाही आवश्यक कागदपत्रे आणि सरल क्रमांकाच्या आधारे कार्ड उपलब्ध करून देण्यात येते.
कार्डमधील रक्कम संपल्यानंतर थेट एसटी बसमधील कंडक्टरकडून रिचार्जची सुविधा उपलब्ध झाल्याने राज्यभरातील सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या सुविधेमुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय कमी होऊन सवलतीच्या प्रवासाची व्यवस्था अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
जिंतूर तालुक्यात एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी काही एजंटांकडून निर्धारित शुल्कापेक्षा जादा पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिक आणि महिलांनी केल्या आहेत. कार्ड काढण्यासाठी काही ठिकाणी २५० ते ३०० रुपये घेतले जात असल्याचे, तर कार्ड मिळताना पुन्हा ५० रुपये घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कार्ड काढण्यासाठी आलेल्या महिलांकडून अशा प्रकारे अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याने संबंधित यंत्रणेने याची चौकशी करून प्रवाशांकडून जादा रक्कम आकारली जात असल्यास त्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अधिकृत शुल्काबाबत प्रवाशांना स्पष्ट माहिती देऊन अनधिकृत वसुलीला आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.