परभणी : जायकवाडी कालव्यातून पाणी न सोडण्याच्या निष्काळजीपणा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सोमवारी (दि.27) पाटबंधारे विभाग क्र. 2 कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची जप्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाला आता धडा शिकवणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने खरीप हंगाम अक्षरशः उध्वस्त झाला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना ना हमीभाव मिळाला, ना पीक विम्याचा दिलासा. उरलेल्या ऊस व भुईमूग पिकांवरच शेतकऱ्यांची आशा टिकून राहिलेली आहे. मात्र 43 अंश सेल्सिअसच्या कडाक्याच्या उष्णतेत पिकांना पाण्याचा तुटवडा भासू लागल्याचे वास्तव समोर आलेले आहे.
मागील पाणी पाळीनंतर तब्बल 27 दिवस उलटूनही कालव्यातून पुरेसा विसर्ग करण्यात आलेला नाही.जायकवाडी कालव्याच्या पाण्यावर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. नियमानुसार किमान 2 हजार क्यूसेक पाणी सोडणे आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ 800 क्यूसेक विसर्ग सुरू असल्याने शेवटच्या टोकाच्या गावांपर्यंत पाणी पोहोचत नाही ही स्थिती दिसत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके करपत असल्याचे भीषण चित्र निर्माण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीत संतप्त शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी सोमवारी पाटबंधारे कार्यालयात दाखल झाले. मात्र कार्यकारी अभियंता अनुपस्थित असल्याने रोष आणखी वाढला. अधिकारी महिन्यातून एक-दोन वेळाच कार्यालयात येतात, बाकी कारभार फोनवरून चालतो, असा आरोप केला. दूरध्वनीवरून संपर्क साधल्यावरही दोन-चार दिवसांत पाणी सोडतो अशा उडवाउडवीच्या उत्तरामुळे संताप अनावर झाला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच जप्त केली. जोपर्यंत जायकवाडी कालव्यातून किमान 1 हजार क्यूसेकने पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत खुर्ची परत दिली जाणार नाही, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, उमेश देशमुख यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत पाणीपुरवठा वाढवावा, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. दरम्यान, धरणे शंभर टक्केभरलेली असताना शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, ही शेतकरीविरोधी व्यवस्था आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.