परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलत दि. ११ ते २२ एप्रिल या कालावधीत सर्व शाळांची धडक पटपडताळणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत इयत्ता दुसरी ते आठवी तसेच नववी ते अकरावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असून, शाळांच्या नोंदीतील 'फुगवटा' उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या सूचनेनुसार नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांच्या काळातच ही कारवाई होणार आहे. त्यामुळे परीक्षा काळातच विद्यार्थी प्रत्यक्ष हजर आहेत का, याची खात्री प्रशासनाला करता येणार आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सविता बिरगे यांनी ही माहिती देताना, नोंदवहीतील आकडे आणि प्रत्यक्ष उपस्थिती यामधील तफावत सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही दिला आहे.
या पटपडताळणीसाठी जिल्हास्तरापासून ते क्षेत्रीय स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत. केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार विभागाचे अधिकारी, डायटचे अधिव्याख्याते तसेच इतर प्रशासकीय अधिकारी थेट शाळांमध्ये जाऊन तपासणी करणार आहेत.
स्टुडंट पोर्टलवरील एचएम, क्लस्टर हेड, बीईओ आणि ईओ लॉगिनच्या माध्यमातून उपस्थित व अनुपस्थित विद्यार्थ्यांची नोंद तात्काळ ऑनलाइन केली जाणार आहे. दरम्यान, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित व इंग्रजी या विषयांच्या वार्षिक परीक्षा अनुक्रमे दि.११, १५ व २२ एप्रिल रोजी होणार असल्याने या कालावधीतच विद्याथ्यांची उपस्थिती काटेकोरपणे तपासली जाणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी ही पटपडताळणी अनिवार्य करण्यात आली असून, शंभर टक्के उपस्थिती सुनिश्चित करा, अन्यथा कारवाई अटळ, असा कडक संदेश शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे. या मोहिमेमुळे शाळांमधील 'भुताटकी' विद्यार्थी, अनियमितता आणि बनावट नोंदींना मोठा आळा बसणार असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.
जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटपडताळणी करणे अनिवार्य असणार आहे. तेंव्हा संबंधित शाळांनी आपापले विद्यार्थी हे शंभर टक्के उपस्थित राहतील याची काळजीपूर्वक दक्षता घ्यावी असे निर्देश शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सविता बिरगे यांनी दिले आहेत.