जिंतूर: पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा बारा दिवसांपासून टायरचा पुरवठा होत नसल्याने टायरविना दहा बसेस जिंतूर आगारात जागेवरच उभ्या आहेत. यामुळे जिंतूर आगारातून धावणाऱ्या अनेक फेऱ्या दररोज रद्द होत आहेत. परिणामी प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन त्वरित टायरचा पुरवठा करून बस सेवा सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांतून होऊ लागली आहे.
जिंतूर आगारात सध्या ४८ बसेस उपलब्ध असून टायर पुरवठा होत नसल्याने गेल्या दहा दिवसापासून १० बसेस आगारात जागेवरच उभ्या आहेत. ३८ बसेस रस्त्यावर धावत आहेत. एकदम १० बसेस कमी झाल्याने नियोजित फेऱ्या पूर्ण करणे शक्य होत नाही. तसेच बस उपलब्ध होत नसल्याने अनेक चालक वाहकांनाही बसून राहावे लागत आहे. त्यांना इच्छा नसताना सुट्टी घ्यावी लागत आहे.
नियमित टायरचा पुरवठा होतो; पण सध्या दहा ते बारा दिवस लोटले तरी टायर पुरवठा झालेला नाही. त्यामुळे १० बसेस जागेवर उभ्या असल्याने एसटीचे आर्थिक नुकसान होते आहे. शिवाय प्रवाशांचेही हाल होत आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. बसस्थानकच्या आवारातच खासगी वाहने उभे करून प्रवाशी वाहतूक केली जात आहे.
हेही वाचलंत का ?