Brinda Karat: बंडखोर आमदारांचा हॉटेलचा खर्च भाजपच्या देणग्यांतून: कॉम्रेड वृंदा करात यांचा गौप्यस्फोट | पुढारी

Brinda Karat: बंडखोर आमदारांचा हॉटेलचा खर्च भाजपच्या देणग्यांतून: कॉम्रेड वृंदा करात यांचा गौप्यस्फोट

विटा : पुढारी वृत्तसेवा: ईडी, सीबीआय, आयटी या संस्था आता लोकांना सत्ताधारी पक्षात आणण्याचे शस्त्र बनले आहे, असा घणाघाती आरोप कम्युनिस्ट नेत्या व माजी खासदार कॉम्रेड वृंदा करात (Brinda Karat) यांनी केला. भाजपला मिळालेल्या देणग्यांतूनच
महाराष्ट्रातील बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांचा पंचतारांकित हॉटेलचा खर्च केला गेला, असा गौप्यस्फोटही त्‍यांनी या वेळी केला. येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार कॉ. वृंदा करात यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिका तारा भावळकर, प्राचार्य डॉ. विश्वास सायनाकर, आमदार अरुण लाड, महापौर दिग्वीजय सूर्यवंशी, भाई सुभाष पवार, अॅड. सुभाष पाटील, कॉ. अजित अभ्यंकर, अॅड. नानासाहे  पाटील, इंद्रजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या वेळी वृंदा करात म्हणाल्या की, दिल्लीत बसून राष्ट्रवाद शिकवणारांनी आतातरी आत्मपरीक्षण करावे. आपल्या देशात धर्मवाद हा राष्ट्रवाद कधीच असू शकत नाही. धर्मावर आधारीत नागरिकत्त्व ही संकल्पना ही या देशात असू शकत नाही. आमचे नागरिकत्व धर्माशी नव्हे, तर घटनेशी बांधील आहे. मात्र भाजप सत्ता मिळवण्यासाठी हिंदुत्त्वाचा हत्यारासारखा वापर करीत आहे. देशात लाखो कामगार उपाशी मरत आहेत. देशातील काही मोजके उद्योगपती साधनसंपत्तीची लूट करीत आहेत. त्यावेळी तुमचा धर्म कुठे असतो. देशातील शंभर अतिश्रीमंत लोकांची संपत्ती ही ५५ करोड जनतेच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. जेव्हा लोक कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करीत होते, तेव्हा देशातील श्रीमंतांची २३ हजार लाख करोडवरून ५७ हजार लाख करोडवर गेली. इतकी असमानता देशात वाढत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात महागाईचा प्रश्नच देशात नाही, अशी टीकाही करात यांनी केली.

क्रांतिसिंह नाना पाटील हे दोन वेळा सामान्य लोकांमधून खासदार झाले.  मात्र आज देशातील ८० टक्के खासदार हे कोटयधीश आहेत. सर्वसामान्य माणूस संसदेत जाईल काय? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सुमारे ४ हजार ७०० कोटी रुपयांची देणगी एकट्या भाजपला मिळाली. अशा देणग्यांचा उपयोग देशातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी भाजप करीत आहे, महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारमधील आमदार सुरत, गुवाहटीच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये योगा करीत होते, असा टोलाही त्यांनी लगावला. आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांनी वाटचाल करावी लागेल. आज देशाला खऱ्या अर्थाने प्रतिसरकारची गरज आहे. या सरकारने त्या काळात शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमाफी दिली होती. त्यासाठी सावकारांच्या घरावर जावून कागदपत्रे जाळली, असेही करात यांनी सांगितले.चळवळीतील अनेक लोकांना सरकारने तुरूंगात डांबले आहे. आपल्याला मिळालेला पुरस्कार चळवळीतील अशा कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचेही करात यांनी यावेळी जाहीर केले.

डॉ. तारा भावळकर म्हणाल्या, गांधी आणि नेहरूंचा द्वेश करणारे नाईलाज म्हणून त्यांच्या नावाचा जय जयकार करीत आहेत. दडपशाही आणि दडपणाखाली सामान्य जनता आजच्या सत्ताधाऱ्यांचे कौतुक करीत आहे. आजच्या इतका इतर विचारधारांबद्दल पराकोटीचा द्वेष यापूर्वी कधीच नव्हता. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास विद्यार्थ्यांना का शिकवला जात नाही, असा सवालही डॉ भवाळकर यांनी केला.  प्राचार्य डॉ. सायनाकर यांनी गोरगरीब मजूरां च्या विकासासाठी राजकारण केले पाहिजे. सिंहाच्या सामर्थ्याने उभे रहा, असा विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या भूमीत रूजवल्याचे सांगितले.

यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, भाई संपतराव पवार, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, जयराम मोरे, विश्वनाथ गायकवाड, गजानन सुतार, क्रांती पाटील, प्राची पाटील, स्नेहा पवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button