भोकरदन ; पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हसनाबाद गावाजवळच गिरीजा नदीपात्रावरील पुलावर महसूल विभागाच्या पथकासमोरच वाळू माफीयांनी एकमेकांवर हल्ला केला. तलवारी आणि लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास घडली. सुमारे एक तास हा राडा सुरू होता अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल नारायण चरावंडे यांच्या फिर्यादीवरून शेख समिर शेख कलीम, जमिर उर्फ जम्मु अहेमद शेख, वसिम अजिज शेख तिघे रा.लतीफपुर ता. भोकरदन पवन विश्वनाथ दानवे रा.पिंपळगांव सुतार, प्रमोद शिवाजी दानवे, सोनाजी शिवाजी खरात (रा. जवखेडा बु ता. भोकरदन जि. जालना) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हसनाबाद येथील गिरजा नदीपात्रामध्ये वाळू माफियांकडून हायवा, जेसीबी, ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. यादरम्यान वाळू उपसण्याच्या हद्दीवरून दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे महसूल विभागाच्या पथकासमोरच हा वाद झाल्याची माहिती आहे. या वादानंतर महसूल विभागाच्या पथकाने या ठिकाणाहून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. यानंतर दोन्ही गटात वाद मिटल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हसनाबाद पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटावर 107 प्रमाणे कारवाई केली आहे.
या प्रकरणी ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र देऊन संबंधीत वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या वाळूमाफियांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवीताला धोका असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलंय. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवण्याचे काम या ठिकाणी होत असल्याचा आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. संबंधित वाळू माफियांवर आणि स्थानिक प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा :