Small landholder farmers in sugarcane fields for employment
धोंडिबा बोरगावे
फुलवळ, पुढारी वृत्तसेवा : ऊन- वारा, पाऊस थंडी या कशाची भीती न आम्हा, काळी आई धनधान्याने ओटी भरेल हीच अपेक्षा आम्हा असा काळ्या आईवर ठाम विश्वास ठेवून तिच्या उदरी शुद्ध बिजाची पेरणी करून निसर्गाकडे एवढेच शेतकरयांच्या हाती असते. परंतु वर्षानुवर्षे बदलत चाललेले निसर्गाचे संतुलन त्यामुळे वातावरणात होत असलेला बदलामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ हा शेतकरी व शेतमजुरांच्या पाचवीला पुजला की काय ? असे म्हणण्याची वेळ कंधार तालुक्यातील कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूरांवर आल्याचे वास्तव चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
म्हणतात ना विंचवाच बिन्हाड पाठीवर... त्याचप्रमाणे या तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यंदाच्या अत्यल्प पावसामुळे भेडसावत असलेल्या कोरड्या दुष्काळातून मार्ग काढण्यासाठी आपल्या कुटुंबाच बिऱ्हाड घेऊन परराज्यात कामाच्या शोधत स्थलांतरित होत आहेत.
या भागातील वाडी तांडे नेहमीच गजबजून असलेली वस्ती पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीत झाल्याने माणसांअभावी मुकी झाल्यागत दिसून येत आहेत. शासन एकीकडे म. ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत मागेल त्याला काम आणि तेही गाव हद्दीतच देऊ असे फतवे काढत असले तरी प्रत्यक्षात मात्र या भागात रो. ह. यो. ची कामेच सुरू नसल्याने नाविलाजास्तव कामासाठी गाव सोडण्याची वेळ अनेकांवर येऊन ठेपली आहे.
या कामगारांच्या छोट्या छोट्या पाल्यांचा विचार करता यांच्या शिक्षणावर पाणीच फेरणार आहे. यंदा आद्यापही हंगामी वसतिगृहे सुरू झाली नसल्यामुळे त्यानी मुलांना सोडावतरी कोठे असा विचार करून आपापल्या मुलांना ते सोबतच नेत आहेत. येथून पुढे चार सहा महिने कामांसाठी बाहेरगावी जात असल्याने कुटुंबाच्या रेशन पाण्याची सोय ते घरूनच करून घेऊन जात आहेत. यातील काही मजुरांना चर्चा केली असता ते म्हणतात की आमच्या हाताला येथे काम मिळत नसल्यामुळे आम्हाला गाव सोडण्याची वेळ आली आहे.
या मजुरांचा विमा संबंधित कारखान्याने उतरवणे अत्यावश्यक आहे. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की आमचा विमा कोणीही काढत नाही. एवढेच नाही तर यांच्या मुलांसाठी जागोजागी वस्ती शाळा उभारून त्यांच होत असलेल शैक्षणिक नुकसान टाळले पाहिजे पण ते ही कोणी करत नाही.