Presence of rain in various parts of Nanded district, relief to the farmer
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: गेल्या दीड महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात हजेरी लावल्याने बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
नांदेड जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला होता. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात होते. दोन नक्षत्र बिनापावसाची गेल्याने परिस्थिती आणखीनच बिकट जाली होती. हवामान खात्याने पाचवेळा पावसाचा अंदाज वर्तवला. परंतु निसर्गान याला हुलकावणी दिली.
माहूर - किनवट परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरीही उर्वरित तालुक्यात सरासरी -पेक्षा कमी पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटली होती. सोमवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात प्रचंड उकाडा होता. सोमवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनाही काही अंशी दिलासा मिळाला.
जिल्ह्यातल्या माहूर, किनवट, अर्धापूर, हिमायतनगर, भोकर, देगलूर, लोहा, कंधार या भागातही आजच्या पावसाने पिकांना तारले. पाऊस झाल्यामुळे आगामी काही दिवसांत जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
दरम्यान हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यात तीन दिवसांचा यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी ४५ ते ५० कि.मी. वेगाने विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. आपत्ती व्यवस्थापनाने यासंदर्भात नागरिकांना आवश्यक त्या सूचना करत सतर्क करण्याचे आवाहन केले आहे.
आकाशात विजा चमकत असतील तर लॅन्डलाईनचा वापर टाळा. शॉवर खाली अंघोळ करू नका. घरातील बेसीनचे नळ, पाईपलाईन याला स्पर्श करू नका तसेच विद्युत उपकरणाचा वापर करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.