नांदेड : वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा पेपरफुटीच्या ग्रहणानंतर अखेर रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला असला, तरी यात नांदेड जिल्ह्यातील 15 हजार 458 विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. दोन वर्षे अहोरात्र मेहनत करून दिलेल्या परीक्षेवर पाणी फिरल्याने विद्यार्थी आणि पालकांवर प्रचंड मानसिक ताण आला असून, संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे सावट पसरले आहे.
पेपरफुटीचे धागेदोरे आणि धक्कादायक वास्तव
राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केलेल्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 720 पैकी तब्बल 600 गुणांचे प्रश्न परीक्षेच्या दोन दिवस आधीच लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सीकरमधील एका वसतिगृह संचालकापासून सुरू झालेली ही साखळी आता संपूर्ण देशात पसरली आहे.
यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांचे 300 हून अधिक हस्तलिखित प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळेच प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या नांदेडच्या विद्यार्थ्यांचे कंबरडे मोडले आहे.
पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराचा आरोप
गेल्या वर्षीही ही परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात होती, मात्र तेव्हा ती रद्द झाली नव्हती. यंदा मात्र आंदोलनाचा रेटा आणि पुराव्यांमुळे केंद्र सरकारला सीबीआय चौकशीचे पाऊल उचलावे लागले. आता ही परीक्षा पुन्हा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पुन्हा शून्यातून तयारी करण्याचे मोठे आव्हान विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले आहे.
जिल्ह्याचा टक्का मोठा, पण पदरी निराशा
नांदेड जिल्ह्यातून या परीक्षेसाठी 15 हजार 840 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 हजार 458 विद्यार्थ्यांनी 3 मे रोजी शहरातील 24 केंद्रांवर अत्यंत कडक वातावरणात ही परीक्षा दिली होती. दहावी उत्तीर्ण झाल्यापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. मात्र, यंत्रणेतील त्रुटी आणि भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे ही परीक्षा आता पुन्हा होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने () स्पष्ट केले आहे. यामुळे “आम्ही करायचे काय?“ असा उद्विग्न सवाल विद्यार्थी विचारत आहेत.
आमच्या मुलांनी दोन वर्षे क्लास, सराव परीक्षा आणि अभ्यासासाठी रक्ताचे पाणी केले. 3 मे रोजी पेपर देऊन मुले सुखावली होती, पण आता पुन्हा तीच धाकधूक सुरू झाली आहे. पुन्हा परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे.गजानन कदम पालक, नांदेड.